जालना- स्वतःच्या तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही ते राज्याला काय देणार? अशा कृषी मंत्र्याला काय चाटायचे का? असा संतप्त प्रश्न ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिनांक 14 रोजी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद पायी दिंडी (टप्पा एक)सोमवारी सुरू झाली आहे. या दिंडीचे उद्घाटन जालना तालुक्यातील नेर येथे असलेल्या श्री वटेश्वर संस्थान येथील महादेवाची घंटा वाजवून आणि अभिषेक करून करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे ,जयप्रकाश चव्हाण, बाला परदेशी, दुर्गेश कठोटीवाले, दीपक रणनवरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री .खैरे म्हणाले की जालन्याचा खासदार हा आता शिवसेनेचा होणार आहे. कारण आत्तापर्यंत “त्या” दोघांमधील आरोप प्रत्यारोप मतदारांनी पाहिले आहेत, वरून जरी वेगवेगळे असले तरी आतून ते एकच आहेत. याची खात्रीही आता मतदारांना पटली आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून बस्तान बसविण्यासाठीच हे साट-लोट आहे, असा आरोपही खैरे यांनी केला. त् भविष्यात आता ठाकरे गटाचाच खासदार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान ठाकरेंची शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी झटणारी शिवसेना आहे. त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी “मी शिवसेनेचा वारकरी, विठ्ठल माझा घरोघरी” हे घोषवाक्य घेऊन जालना तालुक्यात दिनांक 14 पासून पुढील चार दिवस शेतकरी संवाद पायी दिंडी टप्पा – एक, सुरू करण्यात आली आहे. चार दिवसांमध्ये सुमारे 80 किलोमीटर ही दिंडी विविध गावांमधून प्रवास करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये राबविला जाईल अशी माहितीही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी यावेळी दिली.******
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com