जालना- जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जात, परंतु सध्या या मिनी मंत्रालयातीलच महत्त्वाचे अधिकारी एकाच वेळी अभ्यास दौऱ्यावर गेल्यामुळे “अधिकारी दौऱ्यावर, जिल्हा परिषद वाऱ्यावर” अशी परिस्थिती दिसत आहे. त्यातच महत्वाची बाब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देखील कोणाकडेच दिलेला नाही, त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना या दिनांक 26 डिसेंबर पासून रजेवर गेल्या आहेत. त्या आता सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी येतील. त्यानंतर जिल्हा परिषदेचा कारभार पाहणारे तीन वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानंतर सर्व जबाबदारी ही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असते असे शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण तसेच समाज कल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती ज्योती कवडादेवी यांच्यासह काही विस्तार अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच असे एकूण 13 लोक राज्याबाहेर “राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान” अंतर्गत त्रिपुरा येथे अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या तरी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कोणीच नसल्यामुळे सर्वत्र सन्नाटा आहे. अधिकारीच नसतील तर, कर्मचारी कशाला बसतील. त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या गरजू लोकांची अनेक कामे रखडली आहेत.
दौऱ्यावर गेलेल्या वरील तीन अधिकाऱ्यांसह पंचायत समिती अंबडचे आत्माराम चव्हाण ,जालना तालुक्यातील भाटेपुरीच्या सरपंच श्रीमती जयश्री सत्यनारायण गावडे, घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगावच्या सरपंच श्रीमती प्रतिभा प्रदीप बिरनावले, जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेड्याचे सरपंच विठ्ठल सदाशिव गोरे, घनसावंगी तालुक्यातील रांजणीचे सरपंच अमोल गोपाळराव देशमुख ,जालना पंचायत समितीचे ग्रामसेवक मधुकर उत्तमराव ठाकरे ,इस्लाम वाडीच्या ग्रामसेविका श्रीमती दुर्गा परसराम भालके, यांच्यासह जालना पंचायत समितीचे ग्रामसेवक महेश अशोक वझरकर ,श्रीमती अलका श्यामराव धांडे आणि अंबड पंचायत समितीच्या ग्रामसेविका रंजना रामकृष्ण बदर, यांचा समावेश आहे. जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण 13 विभाग आहेत. या 13 विभागांमध्ये पाणीपुरवठा, बांधकाम, जलसंधारण ,शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन ,महिला व बालविकास, समाज कल्याण, वित्त, पंचायत विभाग आणि सामान्य प्रशासन या सर्व विभागांची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असते. परंतु हे दोन्ही अधिकारी एकाच वेळी विविध कामानिमित्त उपस्थित नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172