जालना -स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मनिशंकर अय्यर सोबत जे केलं ते तुम्ही करण्याची वेळ येऊ देऊ नका. ती आणलीच तर तुमचे फोटो तयार ठेवू आणि आमच्या पायात मजबूत वाहना घालून ,असा सज्जड इशारा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.” मी सावरकर” या गौरव यात्रेनिमित्त ते बुधवारी जालन्यात बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार संतोष दानवे अशोकराव पांगारकर, आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसवर टीका करताना श्री. दानवे पुढे म्हणाले की, देशासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले, त्याग केला, तपस्या केली, त्या व्यक्तींना समोर न येऊ देण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. स्वतःची आई- आजी यातच त्यांनी धन्यता मानली. एवढेच नव्हे तर स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सुतक संपण्याच्या अगोदरच राजीव गांधींनी निवडणूक जाहीर केली आणि सहानुभूतीच्या लाटेवर ते निवडून आले. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वजण भारतीय जनता पक्षाला जातीयवादी म्हणत आहेत. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांमध्ये मायावती आहेत, त्यांनी भाजपसोबत दोन वेळा युती केली आणि सरकार स्थापन केले. फारुखा अब्दुल्लांचा मुलगा उमर अब्दुल्ला हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले, एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 1985 ला भाजपासोबत युती केली होती त्या वेळी मी उमेदवार होतो आणि ते माझ्या प्रचाराला आले होते. ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. त्यामुळे आमच्याच पंक्तीत बसून जेवलेले हे सर्व खरकट्या तोंडाचे आहेत. त्यामुळे यांना जातीयवादी म्हणण्याचा अधिकारच नाही असेही श्री. दानवे यांनी खडसावले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही गौरव यात्रा निघाली. कादराबाद सराफा, मार्गे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौकामध्ये या यात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेचे प्रास्ताविक भास्कर दानवे यांनी केले आमदार संतोष दानवे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com