जालना-समोरच्याने जर संयम सोडला तर, आरेला कारे म्हणायचं शिका! असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जालन्यात महिलांना दिला. महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जन सुनावणीसाठी त्या आज दि.2 मार्च रोजी जालन्यात आल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये या जन सुनावणीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कोरे-चाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तीन पॅनलच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींची विभागणी करण्यात आली होती. भरगच्च भरलेल्या या सभागृहामध्ये अनेक महिलांनी आपल्या तक्रारी मांडल्या. या तक्रारी पूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमती रूपाली चाकणकर म्हणाल्या, “चौदाव्या वर्षी मुलीचे लग्न करून देऊन पंधराव्या वर्षी आपण तिच्यावर बाळंतपण लादतो, तिची वाढ झाली का नाही? तिची मानसिकता आहे की नाही? याचा आपण विचारच करत नाहीत. ही मानसिकता बदलण्याची ही गरज आहे. खरं तर महाराष्ट्रासारखे कायदे भारतामध्ये इतर कोणत्याही राज्यात नाहीत. परंतु दुर्दैवाने असे वाटते की हे कायदे तोडण्यासाठीच केले आहेत की काय? असाही भास होत आहे. महिला आयोग कधीही पुरुषाच्या विरोधात नाही. केवळ गैरसमज पसरविला जात आहे. महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. दरम्यान सुनावणी सुरू असतानाच महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले, ज्या महिलांच्या तक्रारी सुमोउपदेशनासाठी आल्या आहेत त्यांनी जर गैर अर्जदाराला तीन वेळा समन्स बजावूनही तो हजर होत नसेल तर त्याला वॉरंट काढून हजर करावे. श्रीमती चाकणकर यांच्यासोबत मुंबई येथून कार्यक्रम अधिकारी आणि समुपदेशक सुनिता गणगे, सकीना शरीफ, जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर, आदी कर्मचारी आले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com