जालना- घर, वाहन, मालमत्ता, सोनं ,चांदी ,दागिने, आदि वस्तूंचे लिलाव आज पर्यंत आपण पाहिले आहेत. परंतु पहिल्यांदाच सुस्थितीत आणि दररोज पूजा- पाठ, नैवेद्य -आरती होणाऱ्या मंदिराचा लिलाव! यावर विश्वास बसत नाही परंतु हे सत्य आहे. त्यामुळे मंदिर घ्या मंदिर …असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही.
जालना शहरातील सारस्वत समाजाने एकत्र येत सन 1999 मध्ये जालना शहरालगत असलेल्या खरपुडी रस्त्यावर( सर्वे नंबर 248-अ मधील 0.77 आर) सरस्वती मंदिराचे मान्यवरांच्या हस्ते वाजत गाजत जाहीरपणे दिनांक 18 जुलै 1999 रोजी भूमिपूजनही केले .या कार्यक्रमाला रामेश्वर शर्मा, ओमप्रकाश ओझा ,नंदलाल शर्मा, आदींची उपस्थिती तर होतीच. विशेष उपस्थिती होती ती या मंदिराला दान देणाऱ्या जागा दान देणाऱ्या डॉ. सारस्वत यांची. अवघ्या दोन वर्षातच हे मंदिर पूर्ण झाले आणि दिनांक 26 ऑक्टोबर 2001 रोजी श्री सरस्वतीची जालना शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून याच सरस्वती मंदिरात प्राणप्रतिष्ठा देखील केली. आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. रोज इथे पूजा -पाठ ,नैवेद्य- आरती नित्यनियमाने. होते मंदिर परिसरही स्वच्छ आणि सुंदर आहे. भाविकही इथे रोज हजेरी लावतात असे असतानाही विश्वस्तांच्या दुर्लक्षामुळे हे मंदिर चिखली को-ऑपरेटिव बँक लिमिटेड चिखली, शाखा बदनापूर ने पाच कोटी रुपयांच्या वसुलीसाठी लिलावात काढले आहे. राकेश दुर्गाप्रसाद शर्मा यांनी या बँकेकडून कर्ज घेतले होते आणि या कर्जासाठी जामीनदार म्हणून अनुजकुमार श्रीनिवास सारस्वत, डॉ. श्रीनिवास बन्सीलाल सारस्वत, कैलास राधाकृष्ण क्षीरसागर, रमेश काशिनाथ वाघमारे, सुनील एकनाथ झोरे, सुनील रामराव काकडे हे होते .परंतु या रकमेची परतफेड न झाल्यामुळे आता सुमारे पाच कोटींच्या वसुलीसाठी या मंदिराचा लीलाव होत आहे.
या मंदिराची न्यास नोंदणी कार्यालयाकडे विश्वस्त म्हणून नोंदणी देखील आहे. परंतु मागील वीस वर्षांमध्ये कुठलीच बैठक किंवा निवडणूक ही झाली नाही. त्यामुळे विश्वस्त मंडळाला अंधारात ठेवून बँकेकडे या मंदिराची जागा गहाण ठेवून हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप सरस्वती मंदिर बचाव संघर्ष समितीने केला आहे. हा बचाव करत असताना एकीकडे कोणी कागदपत्रे दिली हे माहित नाही. अशी भूमिका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सध्या या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्रीनिवास सारस्वत हे काम पाहतात असे सांगायलाही ही संघर्ष समिती विसरली नाही.
विशेष बाब म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून सुस्थितीत असलेल्या मंदिराची जागा चिखली को-ऑपरेटिव बँकेने गहाण ठेवून घेतलीच कशी? कारण तिथे आजही मंदिर उभे आहे, या मंदिराचे विश्वस्त आहेत ,आणि कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा न करता, स्थळ पाहणी न करता चिखली बँकेने हा सर्व प्रकार केला कसा? असा प्रश्न सरस्वती मंदिर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आज या पत्रकार परिषदेला या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष मुरारीलाल सारस्वत, माजी आमदार शकुंतला शर्मा, जितेंद्र ओझा, मनोज शर्मा, मधुसूदन ओझा, शैलेश शर्मा, परीक्षित शर्मा, राम सारस्वत, आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.