जालना- जालना शहरात मंगळवार दिनांक सहा रोजी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वच स्तरातून महापालिकेवर टिकीची झोड उठली, कारण यापूर्वी देखील अनेक वेळा लहान मुलांचे लचके तोडण्याचे प्रकार घडलेले आहेत. परंतु आता बालकाचा जीवच गेल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे .तरी देखील पालिकेला जाग येत नसल्यामुळे आज दिनांक आठ रोजी छत्रपती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून बेशरमाची झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिली.
गावात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड झाली आहे. दिवसा जरी कमी दिसत असली तरी रात्री 10 नंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर सामान्य माणसाला चालणे कठीण झाले आहे. कारण ज्या भागात मांसाहाराची दुकाने आहेत त्या भागात अशा मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. दिवसभर कुठेतरी आराम करायचा आणि रात्री या दुकानातून टाकलेल्या मांसाहारावर ताव मारून पुन्हा नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा या मोकाट कुत्र्यांचा रोजचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सामान्य माणूस रस्त्यावरून जाण्यास धजावतही नाही. या प्रकारा संदर्भात अनेक संस्थांनी, मान्यवरनी, महापालिकेला निवेदनही दिली आहेत परंतु वारंवार महापालिकेकडून “कुत्रे पकडण्यासाठी निविदा काढल्या आहेत आणि लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल” एवढेच उत्तर मिळत आहे . याचा कहर आता सहा तारखेला पाहायला मिळाला आहे म्हणूनच संतापलेल्या छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने जालना महानगरपालिकेसमोर घोषणाबाजी करण्यात आली तसेच टक्केवारीचा आरोपही करण्यात आला आहे. छत्रपती फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील रत्नपारखे यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले.
बातम्यांसाठी संपर्क-दिलीप पोहनेरकर,9422219172