जालना- श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास हे बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे येत आहेत .त्यांच्या उपस्थितीमध्ये कुलकर्णी परिवाराच्या मालकीच्या असलेल्या श्रीराम मंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण आणि श्रीराम पंचायतन नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे .याच वेळी चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती वामनानंद स्वामी यांचे देखील तीन दिवस वास्तव्य येथे राहणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांची देखील रेलचेल या दरम्यान होणार आहे. सहा तारखेला महाप्रसादाने या महोत्सवाचा समारोप होणार होणार असल्याची माहिती एड. सुरेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
बुधवार दिनांक 3 रोजी गोविंददेव गिरी महाराज यांचे आगमन होणार असून दुपारी बारा ते एक वाजे दरम्यान” गावोगावी श्रीराम मंदिराची आवश्यकता” या विषयावर त्यांचे प्रवचन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान श्रीराम पंचायत नूतन मूर्तींची गावातून मिरवणूक निघणार आहे .चार तारखेला चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती वामनानंद स्वामी महाराज यांचे आगमन होणार आहे. पुढील तीन दिवस त्यांचे इथेच वास्तव्य राहणार आहे. याच दिवशी श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी जालना, येथील विश्वस्त वेधशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांचेही प्रवचन होणार आहे. पाच तारखेला दिवसभर धार्मिक विधी झाल्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान विश्वंभर महाराज माळोदे (आळंदी देवाची) यांचे रामायणावर प्रवचन होणार आहे. सहा तारखेला श्रीराम पंचायतनाला पवमान महाअभिषेक व श्री विश्वंभराला महारुद्र होणार आहे .त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच सहा तारखेला महाप्रसादाला उपस्थित राहावे, असे आवाहन एड. सुरेश अंबादासराव कुलकर्णी, सौ. विद्या सुरेश कुलकर्णी ,डॉ. सुयोग, एड सुविध यांनी केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172