जालना- आतापर्यंत वाळू माफिया शासकीय कर्मचाऱ्यांवरच हल्ले करत होते .परंतु आता गावातील शेतकऱ्यांवर देखील हल्ले करायला लागले आहेत. अशीच घटना बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे दिनांक एक मे रोजी घडली.
मदन कृष्णा आरसूड वय 31 वर्ष हे आपल्या आई-वडिलांसह लहूकी नदीच्या काठावर असलेल्या शेतामध्ये घर करून राहतात. त्यांना जाण्या येण्यासाठी नदीतूनच रस्ता आहे .दरम्यान याच गावातील काही लोक नदीपात्रातील वाळूत चोरून नेत आहेत. मोठे मोठे खड्डेही पडले आहेत. परंतु त्याचा काही त्रास नसल्यामुळे कोणीही तक्रार केली नाही. आता मात्र पाणी डोक्याच्या वरून वाहत आहे. आतापर्यंत कोणीही तक्रार न केल्यामुळे वाळू माफियांची हिंमत वाढली आहे. मदन आरसूड यांच्या शेतातील घरातून नदीपात्रात उतरताना उतार आहे आणि या उतारासमोरच हे वाळू चोर मोठा खड्डा करत होते. दरम्यान हा खड्डा झाल्यानंतर उताराने येणारी वाहने, बैलगाडी, तसेच पुढील शेतासाठी जाणाऱ्या वाहनांना देखील मोठा धोका होणार आहे. हा धोका टाळण्यासाठी मदन आरसुड यांनी या वाळू चोरांना विरोध केला. या विरोधाचा बदला म्हणून 10 जणांनी एकत्र येऊन कृष्णा आरसूड यांना दुसऱ्या नदी काठी गाठून बेदम मारहाण केली. यामध्ये कृष्णा आरसूड यांच्या पाठीला जबर जखमा झाल्या आहेत आणि सध्या ते जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान कृष्णा अरसूळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांजरगावच्या जब्बार पठाण, रफिक पठाण, सलमान पठाण, अबुज पठाण ,तौफिक पठाण, वाजेब पठाण, दाऊद पठाण, समीर पठाण, गुलजार पठाण, दिलावर पठाण, या 10 जणांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 351, 352, 190 अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यासंदर्भात या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास लांडगे यांना माहिती विचारली असता रुग्ण दवाखान्यातून घरी गेल्यानंतर आरोपींची चौकशी करू आणि मगच त्यानंतर निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172