जालना -शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींच्या पाण्यामध्ये पाल असल्याचे निदर्शनास आल्यामुळे चार मुलींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन विद्यार्थिनींना उपचार करून रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे .
सामान्य रुग्णालय परिसरामध्ये परिचर्या प्रशिक्षण केंद्र आहे या केंद्रामध्ये सध्या 120 विद्यार्थिनी आहेत. त्यापैकी 51 विद्यार्थिनी एका इमारतीमध्ये आणि उर्वरित दुसऱ्या इमारतीमध्ये आहेत. ज्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला त्या इमारतीमध्ये 51 विद्यार्थिनी पैकी दहा मुली जाणे- येणे करतात आणि 41 विद्यार्थिनी या इथे निवासी आहेत. या विद्यार्थिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर आहे. यामध्ये दररोज पाणी भरले जाते आणि हे थंड पाणी विद्यार्थिनी बॉटलमध्ये भरून पितात. काल दि.6 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास या कुलर खाली बॉटल भरल्यानंतर त्यामध्ये पाल निदर्शनास आली आणि ज्या विद्यार्थिनींनी नुकतेच या कुलरचे पाणी पिले होते त्यांना देखील हा प्रकार ऐकल्यानंतर उलट्या झाल्या. त्यामुळे या विद्यार्थिनींना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती या परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या पार्वती लोडते यांनी दिले आहे.
तोटी मधून पाल येईलच कशी?
दरम्यान या प्रशिक्षण केंद्राचा ताबा घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यामुळे इथे नेहमीच काही ना काहीतरी शहकटशहाचे वातावरण असतेच. काल पाण्यामध्ये आलेली पाल देखील याचाच एक प्रकार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कारण पाण्याच्या टाकीमध्ये पाल निघणे किंवा फिल्टर च्या वरील भागामध्ये आणि पाण्यामध्ये पाल असणे एखादेवेळी समजून घेता येईल मात्र मृत झालेली पाल ही फिल्टरला असलेल्या बारीक तोटी मधून येईलच कशी? असा प्रश्न देखील या वस्तीगृहातील विद्यार्थिनींमध्ये चर्चिला जात आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com