जालना -गेल्या चार वर्षांपासून सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. वारंवार निवेदन देऊन आणि यापूर्वी देखील उपोषण करून काहीच फायदा न झाल्याने आता हे कर्मचारी टोकाची भूमिका घेण्याच्या परिस्थितीत आहेत.
जिल्हा परिषद उपविधी दिनांक 17 ऑक्टोबर 1986 अन्वये जि.प.चे मुख्य लेखा वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची सेवानिवृत्त वेतन व सेवा निवृत्ती विषयक लाभ अदा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती विषयक लाभासाठी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व समस्या उद्भवत आहेत .गेल्या तीन चार वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे मिळणारे लाभ अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे अशा सुमारे 22 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि आता वृद्धापकाळात औषध पाणी देखील मिळायला तयार नाही . येणाऱ्या सन 2023- 24 च्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पामध्ये या कर्मचाऱ्यांसाठी सहा कोटी रुपयांची तरतूद करून ठेवावी अशी मागणी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रस्थापित कर्मचारी वरिष्ठांच्या निदर्शनास चुकीची बाब आणून देत आहेत, त्यामुळेच हा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आज या उपोषणासाठी जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष फकीरा वाघ, जिल्हाध्यक्ष नामदेव धुमाळ, मनोहर कार्लेकर, सुखदेव राठोड, सुनील सोळुंके, कृष्णा अवघड, ए. एस. बनसोडे, आदींची उपस्थिती होती. दरम्यान या उपोषणाला मस्टर असोसिएशन कर्मचारी संघटनेने देखील जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये अध्यक्ष अंबादास सहाने, जिल्हा सरचिटणीस किशोर मुळे ,जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव खेंडके यांचा समावेश आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com