जालना- जालना जिल्हाधिकाऱ्यांची नवीन इमारत म्हणजेच नियोजन भवन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील एसीचे वायर उंदराने कुरतडले होते. त्यामुळे त्यांचा देखील एसी(AC) एक दिवस बंद होता. त्यानंतर उंदरांसाठी पिंजरे आणले आणि उंदीर पकडण्याला सुरुवात झाली. हा प्रकार ताजा असतानाच आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विभागांची आढावा बैठक सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीला खासदार आणि जिल्ह्यातील पाचही आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या अधिकाऱ्यांसाठी विशेष एसीची व्यवस्था केली होती. परंतु सभागृहात बसलेल्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र घाम फुटला तो पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमुळे नव्हे तर सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा म्हणजेच एसी बंद असल्यामुळे.
नऊ कोटी रुपयांचा खर्च 18 कोटी पर्यंत पोहोचूनही या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. हा खर्च कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी वेगवेगळे विभाग तयार करण्यात आले आणि हा खर्च दाखविण्यात आला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील जालना जिल्ह्याची लक्तरे वेशीला टांगली होती. सकाळी सात वाजताच या इमारतीची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना देखील कडक शब्दात सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारतीचे ऑडिट करण्याचे ठरवले होते. कुठे माशी शिंकली? माहित नाही परंतु संभाजीनगरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने देखील हे ऑडिट करायला नकार दिला आणि आता नवीन ऑडिट करणाऱ्या संस्थेची शोधा शोध जिल्हाधिकारी करीत आहेत.
दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सभागृहातील एसी बंद होते? हे का बंद होते याचा शोध घेतल्यानंतर वापरण्यात आलेल्या वायरला विजेचा भार सोसवत नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासह इतर विभागातील एसी सुरू केले की सभागृहातील एसी बंद व्हायचे आणि सभागृहातील सुरू केले की इतर ठिकाणचे बंद व्हायचे. हा खेळ सुमारे दोन तास सुरूच होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील ,कॉन्फरन्स हॉल, तसेच इतर दालनातील एसी बंद केल्यानंतर सभागृहातील दोन-तीन AC सुरू झाले. दरम्यानच्या काळात व्यासपीठावर असलेल्या नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांसाठी असणारे एसी सुरूच होते. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्या- कर्मचाऱ्यांना काय त्रास होतो आहे? हे या वरच्या अधिकाऱ्यांना समजलच नाही. याचा फटका पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाला देखील बसला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये थंड एसीची हवा सोडून केवळ पंख्याच्या हवे खाली बसावे लागले. परंतु मराठीतील …..कोण?या म्हणी प्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांची परिस्थिती झाली. यासंदर्भात नामदार मुंडे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्याला एसी बंद असल्याचे जाणवलच नाही असे सांगून वेळ मारून नेली परंतु त्याच वेळी पुढच्या वेळेस थंडगार एसीमध्ये बैठक घ्या असे सांगून ते निघून गेल्या.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172