आकणी येथे महिलांचा दारूबंदीचा ठराव

मंठा- आकणी ता.मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत (ता.16) सोमवार रोजी विशेष महिला ग्राम सभा घेण्यात आली. या सभेमध्ये गावामध्ये दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला .सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कल्याणराव बोराडे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख मा्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, पंडितराव बोराडे पोलीस पाटील शिवाजी तरासे,ग्रामसेवक व्ही.बी. तेलकर यांची उपस्थिती होती.
आकणी येथील महिलांच्या वतीने दारूबंदी व व्यसनमुक्ती अभियान गावात राबविण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला.गावातील ज्येष्ठ नागरिक,तरुण देखील दारूच्या आहारी गेले असून दररोज 25 ते 30 हजार रुपये दारूवर खर्च होत असल्याचे महिलांनी सांगितले.दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे विदारक चित्र आहे. दारूच्या व्यसनामुळे घरातील करते पुरुष , महिलांना त्रास देत आहेत.मुलाच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे शारीरिक व आर्थिक हानी होत असल्याने मद्यप्राशन करणारे येणाऱ्या पिढ्यांना काय संस्कार करतील ? या गावाचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे पुरुषांच्या हातात पैसा येणार असल्याने उधारी करून पुरुष मंडळी दारूचे व्यसन करत असल्याचेही महिलांनी या वेळेस आवर्जून सांगितले. या वेळी “दारूबंदी झालीच पाहिजे.” “दारूबंदी करूनच दाखवू”अशा घोषणा महिलांच्या वतीने देण्यात आल्या.त्या मुळे गावातील दारूबंदी व संपूर्ण व्यसनमुक्ती अभियान गावात राबविण्यात यावे अशी मागणी गावातील महिलांनी सरपंचाकडे केली आहे.
सरपंच कल्याणराव बोराडे यांनी सांगितले की, मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावाचा विकास हाच माझा ध्यास आहे. आज पासून गावात दारू, गांजा गुटका या प्रकारचे कुठलेही व्यसन करता येणार नाही. व तसे करताना कुणी आढळल्यास त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल. जो कोणी व्यक्ती याबाबत माहिती कळविल त्यास 1000/- रू. बक्षीस म्हणून दिले जातील. यासह गावातील इतर ही समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गोपाळराव बोराडे,ज्येष्ठ पत्रकार बाबूजी तिवारी,रमेश देशपांडे,पोलीस पाटील शिवाजी तरासे यांनी उपस्थित महिलांना समयोचित मार्गदर्शन केले.या दारू बंदी ठरावास मधुकर सापनेर, सुखदेव खनके, उद्धव बोराडे,विठ्ठल बोराडे,बाबुराव राठोड,रामेश्वर नरोटे,सुभाष सापनेर,अनिल मोरे, अनिल बोराडे,दशरथ खनके,उद्धव ताठे, सुंदर मोरे,शिवाजी मोरे,भगवान लोहटे, रंगनाथ वाटाणे,प्रमोद बोराडे,सचिन बोराडे पाठिंबा दर्शविला.या वेळी महिलांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर कविता नरोटे,आनंदा मस्के,कस्तुरबाबाई मोरे,महानंदा चिंतामणी,शारदा कदम, रेखा खनके, केसरबाई बोराडे, कविता नरोटे,सुरेखा बोराडे, शालन बोराडे,शयदा शेख, हुसेणा शेख, सजोबी शेख,सलमा शेख,निता मोरे,आशामती बोराडे, अरुणा बोराडे,मंगल कदम, जया बोराडे,मयुरी बोराडे, यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
———————————————————
ग्रामपंचायत च्या वतीने गावात चार ठिकाणी सार्वजनिक स्वच्छताग्रह उभारण्यात येणार असून बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबीकरण व सक्षमीकरण अभियान गावात राबविण्यात येणार असल्याचे सांगून या साठी गावातील 42 महिला बचत गटांचा एक समूह तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.या साठी या सर्व बचत गटांना मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन गोपाळराव बोराडे यांनी बोलताना दिले.