कमी खर्चात आणि सालगडी विरहित शेती करण्यासाठी बांबू लागवड करा- पाशा पटेल

जालना- सालगाड्या शिवाय आणि कमी माणसांमध्ये शेती करायची असेल तर बांबूच्या शेतीशिवाय पर्याय नाही, या शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखून आताच्या परिस्थिती पेक्षाही जास्त उत्पन्न घेता येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनीच नव्हे तर उद्योजकांनी देखील बांबू शेतीकडे वळावे असे आवाहन शेतीतज्ञ माजी आमदार पाशा पटेल यांनी केले आहे.
लायन्स क्लब ऑफ जालना व महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण आणि बांबू लागवड या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बांबू लागवड, उत्पादन आणि विनियोग याविषयी पाशा पटेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बांबू ही सर्वात गतीने वाढणारी गवत वर्गातील प्रजाती आहे. त्याहीपेक्षा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हवेतील 30 टक्के कार्बन शोषून त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन देणारे हे झाड आहे. कमी पाण्यामध्ये आणि सालगडी विरहित देखील ही शेती करता येऊ शकते. भविष्यात पर्यावरणामध्ये येणाऱ्या बदलांमध्ये टिकून राहणारी ही एकमेव बांबूची शेती आहे. कमी – जास्त पाऊस, अतिवृष्टी कोणत्याही परिस्थितीत हे पीक टिकून राहते औद्योगिक वसाहतीमध्ये जाळण्यासाठी देखील या बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो, आणि तशी मागणीही आहे .मात्र उत्पादनच नसल्यामुळे ती पूर्ण होत नाह.
शासनाने देखील आता शेतीच्या उत्पादनानंतर वाया जाणाऱ्या दहा टक्के जळीताचा प्रकार औद्योगिक वसाहतीमध्ये बगॅस म्हणून उपयोगात आणण्यासाठी आदेश जारी केले आहेत, त्यामुळे बांबूच्या शेतीतून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ शकते असेही ते म्हणाले. त्यासोबत जर जालन्यामध्ये 10हजार एकर बांबू लावला तर दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची जबाबदारी देखील माझी असल्याचेही पाशा पटेल म्हणाले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड, सचिव जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष प्रेमलाता लोया, अतुल लढ्ढा, गोपाळ मानधना, बालाप्रसाद भक्कड, प्रकल्प प्रमुख डॉ. सुयोग कुलकर्णी, भरत मंत्री, कमलाकर मोरे, महेश अग्रवाल ,यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगत घुगे यांनी केले.
श्याम लोया, कमल झुनझुनवाला, डॉ. श्रीमंत मिसाळ, अरुण मित्तल, एस. बी. कुलकर्णी, यांच्यासह शहरातील उद्योजक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार भरत मंत्री यांनी मानले.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172