संकट कोणतेही असो आता डायल करा फक्त” वन वन टू”
जालना -आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पोलीस प्रशासन आता अपडेट होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपत्ती निवारणासाठी सर्वांना एकाच नंबर वर मदत मागता येईल आणि तो नंबर म्हणजे वन वन टू. आग लागली वन वन टू, अपघात झाला वन वन टू, चोरी झाली वन वन टू, नदीला पूर येऊन आपत्ती आली वन वन टू. कुठलेही संकट असू द्या आता एकच नंबर लक्षात ठेवा आणि तो म्हणजे “वन वन टू”(112) पूर्वी पोलिसांची मदत घेण्यासाठी 100 हा नंबर होता. अग्निशमन दलासाठी वेगळा होता, रस्ते अपघातासाठी वेगळा होता, मात्र आता या सर्व संकटांमध्ये मदत मिळवायची असेल तर फक्त एकच नंबर आहे आणि तो म्हणजे वन वन टू .
ही प्रणाली कसे काम करणार ?याविषयी जिल्ह्यातील ठराविक कर्मचाऱ्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. वन वन टू चे निरीक्षक प्रशांत महाजन हे पोलीस अधीक्षक कार्यालयात टप्प्याटप्प्याने या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत .या नंबर वर कॉल केल्यानंतर संबंधित यंत्रणा आपदग्रस्तांना पाच ते सहा प्रश्न विचारेल आणि त्यानंतर ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडे येईल. जिल्हा नियंत्रण कक्षातून लगेचच ही माहिती जीपीआरएस प्रणालीद्वारे त्या घटनेच्या परिसरात असलेल्या संबंधित यंत्रणेला त्वरित देऊन संकटग्रस्त ला मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही मदत हवी असल्यास हाच नंबर आता लावावा लागणार आहे .त्यासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षामध्ये कोणते वाहन कुठे आहे ,हे देखील या अधिकाऱ्यांना कळणार आहे .त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकाला त्वरित मदत मिळणे शक्य होणार आहे. परंतु त्यासोबत पोलिसांना देखील यामध्ये कामचुकारपणा करता येणार नाही, कारण जीपीआरएस प्रणालीद्वारे त्यांचे वाहन कुठे आहे आणि गरजू व्यक्ती कुठे आहे या दोन्ही गोष्टी नियंत्रण कक्षामध्ये दिसणार आहेत.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172