रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी चार महिन्यात दुसऱ्यांदा रास्ता रोको

जालना -बदनापूर आणि जालना विधानसभा मतदार संघाच्या सीमारेषेवर असलेल्या बदनापूर तालुक्यातील काजळा गावच्या ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा जालना बीड महामार्ग अडवून धरला होता. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच अशा प्रकारचे रास्तारोको आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे देऊन हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.
जालना अंबड रस्त्यावर जालन्या आठ किलोमीटर अंतरावर काजळा पाटी आहे, आणि या पाटीपासून साडेतीन किलोमीटर आत मध्ये गेल्यानंतर काजळा गाव आहे. या गावापासून आणखी पुढे गेल्यावर दहा ते पंधरा गाव या रस्त्याला जोडले गेले आहेत. मात्र गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्तीच झाली नाही .त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा जालना- बीड हा महामार्ग अडवून धरला होता. बदनापूर तालुक्यात आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांचा हा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाली आहेत, त्यामुळे काजळा गावच्या ग्रामस्थांसह परिसरातील ग्रामस्थांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला .दरम्यान जालना आणि बदनापूर तहसीलच्या अधिकाऱ्यांनी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी तुर्तास हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र पुढील आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवली असून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आमदार कुचे यांना गावात पाय न ठेऊ देण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे, कारण कुचे यांच्या काजळा परिसरात काही संस्था आहेत आणि त्यांचे नेहमीच येथे येणे-जाणे असते. असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या या आंदोलनामध्ये रंगनाथ देवकाते, शिवप्रकाश चितळकर, प्रकाश गावडे, कैलास हाके, माऊली पैठणे, अशोक पांढरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app