नद्यांचे पुनरुज्जीवन ही लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी डॉ. राठोड

जालना – “स्वप्न उद्याचे, स्वच्छ नद्यांचे”
हे घोषवाक्य घेऊन कुंडलिका -सीना नदीच्या स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली .यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, “माणसाला माणूस बनवण्यासाठी नद्यांचा मोठा वाटा आहे ,परंतु आज माणूस नद्यांना विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत मध्ये ज्या संस्थांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा विडा उचलला आहे त्या सर्वांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. त्यांच्या या कार्याला लोकांनी आपले कार्य समजून लोक चळवळीचे स्वरूप द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलीका -सीना रेजुवेनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन जालना ,च्या वतीने कुंडलिका नदीपात्रात आज अभियानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते.
कार्यक्रम लोक चळवळीचा असल्यामुळे कोणीही अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अशा मानपानाचे पद न देता सर्वच जन सारखे समजून ही चळवळ उभी केली आहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी संदिपान सानप ,उद्योगपती घनश्याम गोयल, सुनील रायठठ्ठा, कैलास लोया, शिवरतन मुंदडा ,ओमप्रकाश चितळकर, जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत, रमेश देवडकर, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक डॉ. वासरे, अमृत शिंदे, यांच्यासह समस्त महाजन च्या प्रभारी नूतन देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. राठोड म्हणाले की लोकसहभागातून ज्याला जसे जमेल तसा त्याने खारीचा वाटा उचलला पाहिजे .या प्रकल्पाअंतर्गत घाणेवाडी ते रोहनवाडी दरम्यान पुढील दोन-तीन वर्षांमध्ये नदी स्वच्छ करणे, भूमिगत बंधारे बांधणे, नदीच्या दोन्ही काठांवर झाडे लावणे, आणि नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे ही कामे केली जाणार आहेत.
*नूतन देसाई*
समस्त महाजन ट्रस्टच्या प्रभारी नूतन देसाई यांनी आज पहिल्यांदाच समस्त महाजन ट्रस्त विषयी सविस्तर माहिती दिली .हे ट्रस्ट म्हणजे कोणा एकाच्या नावाने नव्हे तर समस्त महाजन म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे असा त्याचा अर्थ आहे, आणि “जिओ और जिने दो” या घोषवाक्यावर त्यांचे काम चालू आहे. पाणी क्षेत्रात काम करत असतानाच गो शाळेवर देखील भर दिला जातो .गो शाळेला स्वतंत्र बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून समस्त महाजन ट्रस्ट बाजूला सरकते ,त्यामध्ये कुठेही समस्त महाजन ट्रस्ट चा वाटा किंवा मालकी नसते. केवळ धरणी मातेला सुजलाम-सुफलाम करण्याचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि खेड्यातील संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत. शेती सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा असे उपक्रम हाती घेण्यात आले होते. 2016 मध्ये घनसांवगी तालुक्यात जलक्रांती टीम च्या माध्यमातून देवी दहेगाव या गावामध्ये जलक्रांती करण्यात आली आहे. आजपर्यंत कुठेही मिळाला नाही एवढा लोकसहभाग घनसांवगीला मिळाला असल्याचेही नूतन देसाई यांनी सांगितले .हे सांगतानाच जालन्याला जर समृद्ध करायचे असेल तर कुंडलिका आणि सीना नदीच्या खोलीकणाची नितांत आवश्यकता आहे, आणि त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योगपती सुनील रायठठ्ठा यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपल्या सूचनाही मांडल्या. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.
*मान्यवरांच्या सूचना* राजकीय मंडळींना नदीपात्रात कोणतेही पीक घेऊ देऊ नये किंवा अतिक्रमण करू देऊ नये* शहरातून वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर संरक्षण भिंत बांधावी, जेणेकरून गावातील कचरा नदीपात्रात येणार नाही* नदीपात्रात कचरा टाकणाऱ्याचे छायाचित्र प्रसारित करावे ते प्रसारित करणाऱ्याला पाचशे रुपये बक्षीस आणि कचरा टाकणाऱ्या ला दंड आकारावा* पुलाचे बांधकाम सुरू असतानाच त्या खाली बंधारा बांधावा जेणेकरून पाणी अडून राहील *नदीपात्रात सोडण्यात येणारे घाण पाणी बंद करावे किंवा सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com