Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

64 योगिनी देवीचं आणि पायामध्ये माणसांचे सापळे असणारे हे अनोखे गाव

जालना -प्रत्येक गावाचा कांही ना कांही तरी इतिसास असतोच. तो कुठेतरी दडलेला असतो. असंच एक अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेलं खामपिंपरी(जुनी) हे एक गाव आहे .गाव कधी वसलेला आहे माहित नाही मात्र या गावच्या अनेक कथा नव्हे तर साक्षीपुरावे देणाऱ्या वास्तू आजही इथे पहावयास मिळतात .

गाव जेमतेम हजार-बाराशे लोकसंख्या असलेलं मात्र कायम चर्चेत असणारे! अनादी काळापासून गावात एक बारव आहे तो पुष्करणी म्हणून देखील परिचित आहे. काळानुरूप याची देखभाल दुरुस्ती अवघड होत चालल्यामुळे बारवाचातळ मातीने बुजवून बंद केला आहे, मात्र जमिनीपासून सुमारे 25 फूट खोलीपर्यंत पायऱ्यांच्या माध्यमातून आजही उतरता येते, आणि पाहायला मिळतात त्या 64 योगिनी. योगिनी म्हणजे आभाळातून मुक्त संचार करणाऱ्या देवता ,चारही बाजूने दगडामधे कोरलेल्या आकर्षक या पुरातन मूर्ती आजही उभ्या आहेत. ऊन वारा पाऊस सहन करावा लागत असल्याने नव्हे तर या मूर्ती म्हणजे आभाळातून आलेल्या देवता आहेत आणि त्यांचा मुक्त संचार असतो त्यामुळे त्यांच्या डोक्यावर सावली नाही. पर्यायाने या मूर्तींची याची झीज झाली आहे. पुरातन विभागही याकडे लक्ष द्यायला तयार नाही ,आणि अशी आख्यायिका आहे की रक्तबीज दैत्याचा वध करण्यासाठी या 64 योगिनी भुतलावर आल्या होत्या. रक्तबीज दैत्याला वर होता की त्याचा रक्ताचा थेंब जमिनीवर सांडला तर त्यामधून आणखी दैत्य तयार होतील. त्यामुळे या योगिनी आकाशातून आल्या रक्तबीज दैत्याचा वध केला. त्यासोबत या योगिनी म्हणजे स्त्री शक्तीचे रूपच आहे .

या 12 वा च्या काठावरच महादेवाचे पुरातन मंदिरआहे. या मंदिराच्या समोरच बारव आणि बारावा नंतर असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एकाच रेषेमध्ये एक खांम उभा आहे. कदाचित खांब या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो खांम असा झाला असावा. हा खांम कधीचा आहे माहित नाही, परंतु नुकत्याच यात्रेच्या निमित्ताने गावातील महालक्ष्मीच्या मंदिरात घटी बसलेल्या काही तरुणांनी हा खांम स्वच्छ करण्याचं ठरवलं आणि वर्षानुवर्षे त्याच्यावर फासलेला शेंदूर काढला. जसा-जसा शेंदूर निघाला तसा-तसा हा खाम आकर्षक दिसायला लागला, अखंड पाषाणामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं दिसायला लागलं आणि पुरातन वारसा गावकऱ्यांना पाहायला मिळाला. या कामानंतर बारवा मध्ये गणपतीचे पुरातन मंदिर आहे .चारही बाजूंनी 64 योगिनी इथे विराजमान आहेत. मात्र एका बाजूने बारवाची भिंत पडल्यामुळे गावकऱ्यांनी ती पुन्हा दुरुस्ती केली आहे. मात्र चौसष्ट योगिनींची तिथे पुनर्स्थापना करता आली नाही. याच बारावातुन आणखी एके ठिकाणी जाणारा रस्ता दिसतो मात्र तो अद्याप पर्यंत उघडण्याच्या कोणी भानगडीत गेलं नाही, कारण या प्रवेशद्वारासमोरच अखंड पाषाणामध्ये एक मूर्ती स्थापित आहे. बारवाच्या काठावरच पुरातन महादेवाचे मंदिर आहे. पिंडीवर पंचधातूचा नाग फणा काढून उभा आहे. दुसऱ्या कोपऱ्यावर आणखी एक अखंड शिळा आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसतात आणि चारही बाजूंनी गोपिका नृत्य करताना कोरलेल्या आहेत.याच शिळेच्या बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आहे. खरंतर येथील मूर्ती पाहिल्यानंतर ती कशाची आहे हेच कळत नाही, कारण या मूर्तीला आकारच नाही परंतु मंदिर पुरातन असल्यामुळे ते सर्वांना परिचित आहे, आणि आता गावकऱ्यांनी त्याचा जीर्णोद्धार करून आधुनिक पद्धतीने बांधले आहे. याच महालक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्ताने गावकरी सध्या मंदिरात घटी बसलेले आहेत. नऊ दिवस गावाच्या बाहेर जायचे नाही, कोणाला स्पर्शही करायचा नाही, घरी जायचे नाही, आणि गोड पदार्थ शिवाय दुसरे काहीच खायचं नाही, असे येथील नियम आहेत. शुक्रवार दि.15 रोजी या देवीची यात्रा आहे आणि त्यानिमित्त 12 गाड्या ओढल्या जातात.

ज्या भाविकांनी नवस बोलला आहे तो भाविक या गाड्या ओढतो गाड्यांच्या पुढे एक देवी चा गाडा असतो या गाड्या साठी लागणारी दोन चाके आजही या महालक्ष्मी मंदिरात आहेत ,मात्र ती कधी पासून आहेत हे कोणालाही माहित नाही या गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावच्या परिसरात जिथे ही कुठे तुम्ही नवीन घर बांधणार असाल तर त्यासाठी चार फुटाचा खाली पाया खोदला की माणसांचे सापळे सापडतात. सर्वत्र सापडणारे हे सापळे गावकऱ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. सापळा निघाला की त्याला नदीमध्ये प्रवाहित करायचं किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची आणि आपण आपलं काम सुरू ठेवायचं. असं हे नेहमीचंच झालं आहे .बहुतेक पुराणकाळात 64 योगिनी आणि दैत्यामध्ये झालेला युद्धाच्यावेळी मृत झालेल्या सैनिकांचे हे सापळे असावेत असा कयास लावला जात आहे. खरंतर हा नेमका काय प्रकार आहे? याचा उलगडा पुरातत्व खाते लावू शकते. मात्र या खात्याला ना या सापळ्यांचे काही देणे घेणे आहे,ना जीर्ण होत चाललेल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्तीची देणे-घेणे आहे .हा अमूल्य ठेवा देखील आता झिजयला लागला आहे. गाव तसं हजार-बाराशे लोकसंख्येचं परंतु असंही सांगितलं जातं की या गावामध्ये हिंदू आणि दलित समाजाशिवाय दुसऱ्या समाजाची लोकवस्ती नाही, कारण इतर समाजाचा व्यक्ती येथे राहण्यास आल्यानंतर त्या जिवंत राहत नाहीत, असा आत्तापर्यंतचा गावकऱ्यांचा अनुभव आहे ,असे ते सांगतात त्यामुळे राहण्यासाठी तर सोडाच इथे मुक्कामाला देखील कुणी राहत नाही. अशा विविध प्रकारचा संस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा असलेलं खाम पिंपरी या गावच्या लोकांना आजही पुरातत्व खात्याकडून चांगली अपेक्षा आहे.
येथील या चौसष्ट योगिनींच्या तसेच जमिनीखाली निघणाऱ्या मानवी सापळ्यांचा या खात्याने अभ्यास करावा आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

संतोष पावसे ,महेश मोडके, रमेश दसपुते, राजेंद्र दसपुते, बप्पासाहेब दसपुते, पप्पू गायकवाड ,भक्तराज दसपुते हे गावकरी हा पुरातत्त्व ठेवा जपण्यासाठी धडपडत आहेत .

*कसे पोहोचणार गावात?*अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले खामपिंपरी (जुनी) हे गाव. बाराशे लोकसंख्येच आहे, आणि जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाळा आहे. पैठण शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर तर शेवगाव पासून 22 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे .पैठण- शेवगाव रस्त्यावरून सात किलोमीटर आत मध्ये हे गाव आहे. गावापर्यंत चार चाकी वाहन जाऊ शकते जाताना पाटाच्या बाजूने जावे लागत असल्यामुळे पटातून पाणी भरून असताना एक सुंदर निसर्गरम्य वातावरण पहावयास मिळते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२

मुख पृष्ठ

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button