डिजिटल च्या जमान्यात “बाप्पाला” आजही पुस्तकांची आवड
1500 books frant of bppa

जालना : गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि दीड हजारपेक्षा अधिक पुस्तकांची आरास मांडत सजावट हरिओमनगर मधील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांनी केली आहे. रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,कृष्ण, दासबोध, भारतीय संविधान ,सानेगुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल पुस्तकांसह लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘ स्मृतिचित्रे,साधना आमटे यांचे ‘ समिधा’ अशा पुस्तकांची आरास मांडण्यात आलेली आहे.
ग्रंथ हेच गुरु आणि ग्रंथ हीच संपत्ती असा विचार करीत यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सदाव्रते परिवारानेघेतला. दोन वर्षांपासून निर्बंध होते,अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी मस्तक घडविणारे पुस्तक असते,असा विचार घेत घरातील पुस्तकांची आरास मांडण्याचा विचार सुयोग सायली या मुलांनी बोलून दाखविला.एका दिवसात विविध विषयावरील पुस्तकांची मांडणी करीत सजावट करण्यात आली.गणपती आरास सजावटीत साने गुरुजी यांच्या ‘ श्यामची आई ‘ या पुस्तकासह ‘भारतीय संस्कृती,मंदिर प्रवेशाची भाषणे अशी २५ पुस्तके आहेत. गणपतीसमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता,संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष अशी पुस्तके आहेत. स्वामी विवेकानंद जीवनचरित्र,युवा चेतना,आदर्श शिक्षण ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. समर्थ रामदास स्वामी यांचे ‘ दासबोध’, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांचे अभंगाचे पुस्तके आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘ ग्रामगीता,कवी बा.भ.बोरकर यांचा ‘आनंद भैरवी’ हा कवितासंग्रह, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा ‘धृपद’ हा कवितासंग्रह असून मराठी बखर गद्य हे पुस्तक आहे. साधना आमटे ‘ समिधा’, सुनीता देशपांडे यांचे ‘ आहे मनोहर तरी, लेखिका वीणा गवाणकर यांचे गाजलेले ‘ एक होता काव्हॆर’ अशी अनेक पुस्तके मांडण्यात आली आहे. गणपती सजावट आरास मांडणीत भारतीय संविधान ‘ हे पुस्तक लक्ष वेधून घेते. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,लोकमान्य टिळक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणारे बालकथेची पुस्तकेही मांडण्यात आलेली आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या साधना साप्ताहिकाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. गणपती आरास सजावटीत ‘ साधना’ दिवाळी अंकही मांडण्यात आले आहेत. आरास सजावटीत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर, वि.वा.शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेतात.मांडणीत स्त्री जीवन विषयक साहित्यात शांता शेळके, इंदिरा संत,सरोजिनी बाबर,बहिणाबाई चौधरी यांची छायाचित्रेही दर्शनी भागात मांडण्यात आली आहे.
गणेशोत्सव साजरा करताना वैचारिक परंपरा जोपासली जावी,अशी अपेक्षा आहे. आम्ही धार्मिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक,महिला अशा विविध विषयांवरील पुस्तके मांडली आहे. दोन दिवसापासून पुस्तकांची तयारी चाललेली होती. जवळपास एक हजारपेक्षा जास्त पुस्तके यात आहेत.
लक्षवेधी आरास
•पुस्तकांची आरास मांडत ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरीला’ पुणेरी पगडी घालण्यात आली आहे.•पुस्तकांमध्ये सर्वात समोर भारताचे संविधान हे पुस्तक दिसून येते.•आरास मांडत लाकडी बैलगाडी लक्ष वेधून घेते,यात समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘ दासबोध ‘ हा ग्रंथ ठेवण्यात आला आहे.•सजावटीत बैलगाडीत छोटाले पुस्तक असून माधव राजगुरु यांचे ‘ शुध्दलेखन’ हे पुस्तक आहे.•सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे इस्लामी संस्कृती हे साने गुरुजींचे पुस्तक, गुरुनानक म्हणतात,महंमद पैगंबर म्हणतात, गौतम बुध्दाचे चरित्र, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडणारे ‘ प्रश्न तुमचा उत्तर डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांचे अशी पुस्तके मांडण्यात आलेली आहेत.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com