शिक्षणाच्या “योजना”तच “नियोजनाचा” अभाव मुख्याध्यापक त्रस्त
जालना- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती सारख्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी पूर्वी असलेल्या प्रौढ शिक्षण विभागाकडे म्हणजेच आताच्या शिक्षणाधिकारी (योजना) विभागाकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक आणि नोडल ऑफिसर वर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचे “थंब”(अंगठा) असणे आवश्यक आहे. हे थंब कार्यान्वित करण्याचे काम शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी( योजना) हा विभाग काम करत आहे. मात्र याच विभागात नियोजनाचा अभाव असल्यामुळे सोमवारी महिला शिक्षकांसह अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये हा विभाग कार्यरत आहे. शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती लता सानप- मुंढे या कार्यरत आहेत. 1934 मुख्याध्यापक आणि 1934 नोडल ऑफिसर यांना हे काम करण्यासाठी बायोमेट्रिक करणे बंधनकारक आहे. जेणेकरून ही सर्व योजना व्यवस्थितपणे कार्यान्वित होईल. या दोघांनाही या योजनेविषयीची माहिती असणार आहे. त्याच सोबत याच विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती तलत आलम सय्यद यांचे देखील थंब लागत आहे. यापूर्वी योजना विभागाने संबंधित केंद्रांमध्ये जाऊन त्या- त्या शिक्षकांचे बायोमेट्रिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार प्रयत्न करूनही हे काम पूर्ण न झाल्याने जालना येथील कार्यालयात भोकरदन आणि घनसांवगी तालुक्यातील उर्वरित अधिकाऱ्यांना सोमवारी बोलावण्यात आले होते ,मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून आलेल्या महिला शिक्षकांसह सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला. ना बसण्याची जागा न पिण्याचे पाणी त्यामुळे या कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडालेला होता. यासंदर्भात शिक्षणाधिकारी श्रीमती सानप यांनी सांगितले की कार्यालयामध्ये अपुरी यंत्रणा असल्यामुळे संगणक नाही आणि एकाच वेळी दोन तालुके बोलावल्यामुळे कामाचा ताण पडला आहे. पुढच्या वेळी एक एक तालुका बोलावून यामध्ये सुधारणा करण्यात येईल..
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172