केजरीवाल म्हणतात शरद पवारांसोबत फक्त काम करा ,कसं करणार?
जालना
देशाचे रक्षण करणारा सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक अडचणींना तोंड देत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासनासोबत शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहोत, मात्र त्या सुटत नाहीत. त्यासाठी आता 26 जुलैला कारगिल दिनाचे औचित्य साधून सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.अरविंद केजरीवाल आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत या दोघेही एके काळी एकाच व्यासपीठावरून युतीच्या सरकारवर निशाणा साधत होते. मात्र आता सावंत यांनी आप ला सोडचिठ्ठी दिली आहे. याचे कारण विचारले असता ते म्हणाले “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शरद पवारांसोबत फक्त काम करा म्हणतात, निवडणुका लढवू नका ,मग आम्ही कसं काम करणार ?”असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे .आज रविवार दिनांक चार रोजी सैनिक फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त ते जालन्यात आले होते.
सुधीर सावंत पुढे म्हणाले, सैनिकांच्या अनेक समस्या आहेत .त्यामध्ये महत्त्वाची समस्या आहे ती काही वर्ष सेवा घेतल्यानंतर सैनिकाला सेवानिवृत्त केल्या जाते. हा या सैनिकांवर अन्याय आहे. सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच या सैनिकाला देखील वयोमानानुसार सेवानिवृत्त करावे, शहिदाच्या कुटुंबातील नातेवाईकांना शासकीय सेवेमध्ये त्वरित सामावून घेण्यात यावे. त्याच सोबत सैनिकासाठी शिक्षक असलेल्या चौदाशे जागा रिक्त आहेत त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात, पाचशे माजी सैनिकांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे मात्र अद्याप पर्यंत नियुक्ती दिलेली नाही, ती देखील त्वरित देण्यात यावी या व अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान पूर्वी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेल्या सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी काही दिवस आम आदमी पार्टीचेही काम केले आहे. पाच वर्षांपूर्वी केजरीवाल महाराष्ट्रात दौऱ्यावर आले होते ,या सर्व दौऱ्यामध्ये सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यासपीठ सांभाळले आणि तत्कालीन युती सरकार वर कडाडून टीका केली. परंतु आता त्यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता सावंत म्हणाले की, केजरीवाल हे आम्हाला शरद पवारांसोबत फक्त काम करा निवडणूक लढवू नका असे सांगत होते, निवडणूक लढवायची नाही तर काम कशाला करायचे? आणि करायचे असेल तर केजरीवालांनी सांगायची काय गरज ?आम्ही स्वतः जाऊन त्यांच्यासोबत काम करू शकतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी केजरीवाल यांनी यांना लगावला. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षासोबत न जाता माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यावर भर असणार असल्याचेही सुधीर सावंत म्हणाले.
(अपडेट बातम्या पाहण्यासाठी ॲप डाऊनलोड करा)