जालना- ग्रामीण भागातील बळीराजाचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळा. पशु कोणत्याही प्रकारातला असो त्याला सजवणे आणि सणानिमित्त गोड खाऊ घालने हा बळीराजाच्या छंद .बळीराजा हा छंद पूर्ण करतो तो पोळ्याच्या दिवशी.
एवढेच नव्हे तर आपल्या लाडक्या सर्जा -राजाला धुऊन स्वच्छ करून रंगीबेरंगी झूल घालून गावांमध्ये हलगी आणि तडमताशा च्या आवाजामध्ये दिमाखात मिरविलेही जाते आणि या मिरवणुकी दरम्यान देवाच्या दारात श्रीफळ फोडण्याची ही पद्धत आहे. यामध्ये मिरवून बैल घरी आल्यानंतर एक नारळ हनुमानाच्या मंदिरात दुसरा नारळ म्हसोबा ला तिसरे नारळ आणि अन्य दोन ग्रामदेवतांना अशी कमीतकमी 5 नारळ फोडली जातात.म्हणूनच जालना जिल्ह्यामध्ये उद्या पोळा सण आणि अमावस्या निमित्त सुमारे पाच कोटींची 30 लाख नारळ फुटण्याची शक्यता आहे. विश्वास बसत नाही! मात्र नारळा मध्ये झालेली ही उलाढाल आहे. याही पेक्षा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय कोरोना काळ सोडला तर पस्तीस टक्के कमी झाला आहे. जालना शहरात नारळाची ठोक विक्री करणारे चार व्यापारी आहेत. त्यामध्ये एक सुरेशचंद पन्नालाल जैन दुसरे अनिलकुमार नारायणदास पंच आणि अन्य दोन असे एकूण चार जण आहेत. तामिळनाडू येथील डेडीगल, मदुराई या ठिकाणाहून तर आंध्र प्रदेशातून पालकोल, राजोल, काकीनाडा या ठिकाणाहून ही नारळे येतात,ती येण्यासाठी आंध्र प्रदेशातून दोन दिवस तर तामिळनाडूतून चार दिवस लागतात. या नारळा मध्ये साधारण चार प्रकार आहेत. त्यामध्ये गोल, चाररेषा वाला, मुंबई टाकला, आणि कच्चा नारियल पोळ्यासाठी विशेष करून गोल नारळ वापरतात. कारण या नारळाचे खोबरे लवकर निघते.
असे आहे गणित
नियोजित ठिकाणाहून मालवाहू वाहनांमध्ये एका वाहनात एका पोत्यामध्ये साठ नारळ अशी पाचशे पोती भरली जातात. म्हणजेच एका ट्रकमध्ये 30हजार नारळ येतात. अशा शंभर ट्रक पोळा निमित्त जालनात आल्याआहेत. 100 ट्रक म्हणजेच 30 लाख नारळ झाली आणि ठोक विक्रीमध्ये हे नारळ पंधरा रुपयांना किरकोळ विक्रेत्यांना विकल्या जाते, आणि त्यावर किरकोळ विक्रेता त्याचा नफा लावून 16 रुपये ते 22 रुपयांच्या दरम्यान हे नारळ विकतो. त्यानुसार उद्या पोळ्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये सुमारे पाच कोटींची 30 लाख नारळ फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी सणा प्रमाणेच या सणाची उलाढाल देखील दिसत नसली तरी मोठी आहे .ही उलाढाल फक्त नारळाची आहे. यासोबत बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य झूल , वेसन, मुंगूस, घुंगरमाळा, कासरे हे तर वेगळेच आणि अमावस्या निमित्त अनेक नागरिक कवड्या, लिंबू, मिरची, काळी भावली असे विविध प्रकार वापरतात. त्याची ही उलाढाल वेगळी आहे. एकंदरीत नारळाची ही उलाढाल सामान्य माणसाला तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.
-दिलीप पोहनेरकर,9422219172