जेईएस मध्ये “वसंतोत्सव”; मृगनयनी भगिनी फुलविणार भरतनाट्यम चा पिसारा तर 30 जणांचा संच करणार “घोळ मटन”

जालना –येथील जेईएस महाविद्यालयात दिनांक २६ आणि २७ एप्रिलरोजी भव्य ‘जेईएस वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 रोजी पहिल्या दिवशी या वसंतोत्सवात “मृगनयनी” म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईशिता व ईशानी कुलकर्णी भगिनी नृत्य अविष्काराच्या माध्यमातून आपला पिसारा फुलवणार आहेत तर दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 27 रोजी 30 जणांचा संच “घोळ मटन”हे नाटक सादर करणार आहेत या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव संगीत, नृत्य – नाट्याने रंगणार असल्याची माहिती जे.इ.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी दिली. याप्रसंगी डॉ. महिनी रायबागकर, डॉ. यशवंत सोनुने, सतीश लिंगडे, सुमित शर्मा यांची उपस्थिती होती.
शनिवार, (दि . २६) रोजी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या चुन्नीलाल गिरीलाल सभागृहात या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख आणि जेष्ठ रंगकर्मी डॉ. जयंत शेवतेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून जालना येथील प्रसिद्ध उद्योजक घनश्यामजी गोयल आणि प्रमुख उपस्थिती म्हणून जालना एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीनिवासजी भक्कड लाभणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी बगडिया भूषवणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच सुप्रसिद्ध नृत्यांगना ईशिता व ईशानी कुलकर्णी या मृगनयनी भगिनी ‘वाल्मिकी वाणी – चिरंजीवकाव्य’ या संकल्पनेवर आधारित मोहक नृत्य सादर करणार आहेत. त्यांच्या विषयानुरूप नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत येणार आहे.
दुसऱ्या दिवशी, रविवार (दि. २७) रोजी सायंकाळी ७ वाजता उत्कर्ष थिएटर्स जालना आणि नाट्यांकुर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन राज्यनाट्य स्पर्धेत विजेते ठरलेले दोन अंकी नाटक ‘घोळमटण’ सादर केले जाणार आहे. सतीश लिंगडे यांचे लेखन आणि सुमीत शर्मा यांचे दिग्दर्शन असलेला हा नाट्यप्रयोग आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी शहरातील सर्व रसिकांना या बहुरंगी आणि मनोहारी सांस्कृतिक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. हे दोन्ही कार्यक्रम जे. इ. एस. महाविद्यालयातच होणार आहेत.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172
कुमारी ईशिता आणि ईशानी कुलकर्णी या दोन्ही व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांनी भरतनाट्यमचा प्राथमिक पाया गुरु व्ही. सौम्याश्री यांच्या मार्गदर्शनाखाली घातला आणि त्या सध्या गुरु श्री वैभव आरेकर यांच्याकडून कसून प्रशिक्षण घेत आहेत. ईशिताने हिंदुस्तानी संगीत आणि भरतनाट्यम या दोन्ही विषयात पदवी आणि भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तर ईशानी इयत्ता १२ वी मध्ये शिकत आहे.
उल्लेखनीय कार्यक्रम:
- ईशिताने देवमुद्रा गटासोबत इटलीमध्ये आयोजित ‘४६ व्या गाला भव्य आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवा’त (२०१७) सादरीकरण केले.
- भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाद्वारे (एनएसडी) आयोजित ८ व्या रंगभूमी ऑलिम्पिकमध्ये देवमुद्रा गटासोबत ईशिताने सादरीकरण केले. (२०१८)
- ईशिताने रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ – भोपाळ येथे आयोजित ‘भारतीय सांस्कृतिक आणि संवाद परंपरा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘भारतीय महाकाव्यांमधील संवाद पद्धती – भरतनाट्यम’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचा राष्ट्रीय परिषदेतील निवडक शोधनिबंधांच्या पुस्तकात समावेश करण्यात आला. (२०२१)
- दोघींनाही भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे ‘सीसीआरटी युवा कलाकार शिष्यवृत्ती’ प्राप्त झाली आहे. (२०२१)
- दोघींनीही वैभव आरेकर यांच्या संख्या डान्स कंपनीसोबत ‘बोधकथा – पंचतंत्राचे पुनर्आख्यान’ चे ग्रीप्स थिएटर फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण केले. (२०२४)
- हृषिकेश पवार यांनी क्युरेट केलेल्या ‘साशा वाल्ट्झ अँड गेस्ट्स’ यांच्या ‘सी’_ मध्ये ईशिताने सादरीकरण केले. (२०२४)
- पोलंडमध्ये संख्या डान्स कंपनीसोबत ‘Viva Kultura’ महोत्सवात सादरीकरण केले. (२०२४)
- ईशानीने वयाच्या १० व्या वर्षी तिचा ‘अरंगेत्रम’ (पहिला एकल सार्वजनिक नृत्याविष्कार) सादर केला. (२०१८)
- बल्गेरियन ई-वृत्तपत्रात ईशानीची मुलाखत प्रकाशित झाली आहे.
- ईशानीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकली आहेत, ज्यात अलीकडेच अक्षता कुलकर्णी स्मृती स्पर्धेत मिळालेल्या प्रथम क्रमांकाचा समावेश आहे.