जालना – खाजगी शैक्षणिक संस्थांचे गल्लीबोळात वाढलेले पीक लक्षात घेता एकीकडे जालना जिल्हा परिषदेच्या तुकड्या आणि शाळाही बंद होत आहेत .अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात शिक्षणाची वाताहात होत आहे. परंतु काही गावांची होणारी गैरसोय आणि तेथील शिक्षकांची धडपड पाहता नवीन वर्गखोल्या सुरू करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काय निर्णय व्हायचा तो होईल, परंतु असेही गटशिक्षणाधिकारी आहेत की ज्यांना खाजगी शैक्षणिक संस्थांची मोठ्या प्रमाणात काळजी आहे. मग त्या गावचं काहीही होवो ,आपला पगार तर चालू आहे ना! गावकऱ्यांशी काय देणं घेणं? असे एक ना अनेक प्रश्न या एका प्रस्तावावरून उपस्थित व्हायला लागले आहेत. हा प्रस्ताव आहे बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा या गावचा.

बदनापूर येथील गटशिक्षणाधिकार्याला या गावची काय अलर्जी आहे किंवा शेजारच्या गावच्या शाळेशी काय देणंघेणं आहे ते माहीत नाही, परंतु शालेय समितीने पाठवलेला प्रस्तावच त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवला नाही. त्यामुळे गावकरी हताश झाले आहेत .
जालना जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या वर्गांच्या तुकड्या वाढवण्यासाठी किंवा नवीन वर्ग सुरू करण्यासाठी एकूण 32 प्रस्ताव आले होते. त्यापैकी भोकरदन तालुका 20, बदनापूर तीन, परतुर दोन, जालना एक, मंठा एक, जाफराबाद पाच, असे प्रस्ताव आहेत, तर अंबड आणि घनसावंगी तालुक्याला कोणताही वर्ग वाढीची गरज नसल्याचे दिसून येते. खरे तर असे वर्ग वाढवताना शासनाच्या काही अटी व शर्ती आहेत. जसे की आहे त्या शाळेपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत दुसरी शाळा नसावी आणि इतरही काही निकष आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रस्ताव आल्यानंतर हे निकष तपासले जातात आणि त्यानंतर निर्णय घेतल जातो. परंतु जर हे प्रस्ताव िक्षणाधिकार्यापर्यंत आलेच नाहीत तर यामध्ये कोणाचे हित जोपासले जात आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातो.
खरं म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा चालवण्यातच काही रस राहिलेला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचे देखील चाललय चालू द्या! हीच भूमिका असते. कारण दर तीन वर्षांनी बदली होणार आहे हे देखील निश्चित आहे. मग त्या गावाशी आपल्याला काय देणे घेणे? असे म्हणत कुठलाही वेगळा निर्णय, वेगळा प्रयोग न करता, आहे तेच काम कसं कमी करता येईल यावर जास्त भर असतो. त्यातीलच हा एक प्रकार. वर्गखोली वाढवायची, नाही वाढवायची, निकषात बसते, नाही बसते, हे सगळं तपासण्याचे काम शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केल्या जाते. मग पुन्हा त्याची माहिती त्याच गटशिक्षणाधिकाऱ्याकडून घेतल्या जाते. परंतु जर प्रस्तावच वरिष्ठापर्यंत जात नसेल तर मग मात्र शंकेची पाल चुकचूकल्याशिवाय राहत नाही .
आपल्या गावची शाळा कशी चालवायची याचे सर्व अधिकार हे शालेय समितीला आहेत आणि त्या अनुषंगाने शालेय समिती वेळोवेळी बैठका घेऊन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाला निर्देशित करते. त्या अनुषंगाने गोकुळवाडीच्या शालेय समितीने दिनांक 26 जानेवारी 2026 ला ठराव घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सहावीचा वर्ग वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निश्चित केले. गावामध्ये सध्या पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. त्यामुळे सहावी साठी या विद्यार्थ्यांना पाठवायचे कुठे? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता सध्या सहावीच्या वर्गासाठी 16 विद्यार्थी उपलब्ध आहेत आणि वर्ग सुरू झाला तर अन्य काही गावातील देखील विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोषक वातावरण असलेल्या या गावाने पुढाकार घेऊन प्रस्ताव पाठवला नवीन वर्षाच्या शाळा सुरू होण्यापूर्वी त्यावर निर्णय घेतला जाईल या अनुषंगाने शालेय समितीने दिनांक 8 एप्रिल 2026 रोजीच हा प्रस्ताव बदनापूर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांना या प्रस्तावाची ऍलर्जी निघाली आणि त्यांनी तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवीलच नाही . आता शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सहावीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा होता ते विद्यार्थी इतरत्र गेले आहेत. एकंदरीत काय तर वर्ग वाढ न करण्याचा जो हेतू होता तो सफल झाला आणि आता शाळा सुरू झाल्यामुळे यावर्षी तरी नवीन वर्ग सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172