जालना – छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकीवरून जालन्यात येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आहे. चार जणांच्या या टोळीने तीन दिवसांमध्ये दोन साखळ्या चोरल्या आहेत आणि तिसऱ्या एका प्रकरणात त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. याच प्रकरणात पाचवा आरोपी म्हणून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या एका सोनारालाही अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील साजापूर येथील सुमित सुभाष रुपेकर वय 21 वर्ष, चैतन्य कैलास गायकवाड वय 21 वर्ष, शुभम वसंत वैद्य वय 25 वर्ष, अजय रोहिदास गांगुर्डे वय 26 वर्ष राहणार रांजणगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि या सर्व टोळीकडून जमा करून आलेले सोने घेणारा पाचवा आरोपी अजय अरुण लोळगे वय 28 वर्ष, राहणार एन 6,सिडको या पाचही जणांना जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या टोळीने दिनांक 29 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुन्या जालन्यातील महसूल कॉलनी येथे राहणाऱ्या उषा शरद अडाने वय 39 वर्ष यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली होती. हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दिनांक एक जुलैला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नवीन जालना भागात माणिकनगर येथे राहणाऱ्या संगीता गोपीकिशन लोहिया वय 58 ,या स्कुटीवरून जात असताना त्यांच्या गळ्यातील देखील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. तिसरा प्रकरणात याच दिवशी साडेचार वाजेच्या सुमारास बडी सडक वरील एका बँकेसमोर शकुंतला शिवकुमार राठी वय 65 , या स्कुटी वरून जात असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. अवघ्या तीन दिवसात सलग झालेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर एक आव्हान उभे होते. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि याचा तपास सुरू झाला. तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावला आणि छत्रपती संभाजीनगर येथील पाचही आरोपींना अटक केली आहे.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172