जालना- जिल्ह्यामध्ये पाऊस अजून सुरूही झाला नाही मात्र तत्पूर्वी आलेल्या विजेचा कडकडाटाने दोन जणांचा बळी घेतला आहे .त्यामध्ये भोकरदन तालुक्यातील एक 45 वर्षीय महिला आणि दुसरा बळी म्हणजे मंठा तालुक्यातील बावीस वर्षीय तरुणाचा आहे.
मंठा तालुक्यातील पेवा येथे राहणारे अनिल भारत शिंदे वय 22, हे दुपारी शेतामध्ये काम करत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि एक वीज त्यांच्या अंगावर कोसळली यामध्ये अनिल शिंदे यांचा बळी गेला आहे .दरम्यान त्यांना उपचारासाठी मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राहुल राठोड यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अनिल शिंदे हे जालना जिल्ह्यात आज विजेचे दुसरे बळी ठरले आहेत.
दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये पुढील दोन-तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.