जालना- महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने “शिक्षक साहित्य संमेलन “आयोजित केले होते. जालना शहरांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या शाळा, सभागृह असताना देखील शहराच्या बाहेर खरपुडी येथे कृषी विज्ञान केंद्राच्या आमची शाळा येथे सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी हे संमेलन पार पडले. हे संमेलन म्हणजे “गाव जले हनुमान बाहर” अशीच काही परिस्थिती पाहायला मिळाली. निवडणुकीची कामे कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थित नाहीत आणि ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे नाहीत असे अनेक साहित्यिक शिक्षक कर्मचारी आठवड्याच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी साहित्य संमेलनामध्ये दिसून आले. कार्यक्रम शासनाचा असल्यामुळे त्यांची उपस्थिती चुकीची नाही परंतु कामकाजाच्या पहिल्याच दिवशी ही परिस्थिती उद्भवल्यामुळे जे गरजू शासकीय कार्यालयात कामकाजासाठी गेले त्यांचे काय असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनामध्ये सहभागी साहित्यिकांशिवाय इतर साहित्यिकांची नगण्य उपस्थिती होती. कदाचित ही परिस्थिती उद्भवेल असा अंदाज आयोजकांना आला असावा, त्यामुळेच की काय जालना शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे कारणही तसेच होते शिक्षक याकडे पाठ फिरवतील असा अंदाज त्यांना होता म्हणूनच की किमान विद्यार्थ्यांची तरी गर्दी या संमेलनाला दिसावी असा कयास लावला होता. परंतु शाळांना सुट्टी असल्यामुळे गावात ते देखील शक्य नव्हते. त्यानंतर आयोजकांना सुचली एक सुप्त कल्पना खरपुडी येथे पार्थ सैनिकी शाळा आणि कृषी विज्ञान केंद्राची आमची शाळा या दोन्ही निवासी शाळा आहेत. त्यामुळे इथे विद्यार्थी उपस्थित असतात आणि या विद्यार्थ्यांची गर्दी सभामंडपात दिसून येईल हा त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.
सध्या निवडणुकीच्या कामामध्ये अनेक शिक्षक गुंतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये हे संमेलन जर गावांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या सभागृहात घेतले असते तर कदाचित साहित्यिक शिक्षकांची गर्दी झालीही असती परंतु एवढ्या मोठ्या सभागृहात सुमारे 50 निमंत्रित साहित्यिक आणि सभागृह रिकामे दिसल्यावर हसे होऊ नये म्हणून हे संमेलन गावाबाहेर घेतले असावे तिथेही तेच झाले.
सकाळी दहा वाजता आयोजित या संमेलनाची सुरुवात साडेअकरा वाजता झाली आणि काही साहित्यिक शिक्षक बारा वाजेच्या सुमारास कपाळावर आलेला घाम टिपत, उन्हाच्या पाण्यामध्ये गरम होऊनच संमेलनाला हजर झाले साहजिकच शरीर गरम झाल्यामुळे या संमेलनाबद्दल तोंडातून शब्दही गरमच बाहेर पडू लागले. या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे उद्घाटक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे गायकवाड तर कार्यवाह म्हणून सुहास सदाव्रते हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर दाते यांनी केले . हे संमेलन कशासाठी ?कोणासाठी ? का ? आणि काय साध्य केलं? असे अनेक प्रश्न साहित्यिक नसलेल्या शिक्षकांनी उपस्थित केले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172