जालना- जमाना कितीही बदलला डिजिटल झाला तरी “जुनं ते सोनं” ही म्हण काही खोटी नाही. जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराज यांच्या यात्रेमध्ये वर्षभरात जेवढा व्यवसाय होतो तेवढाच व्यवसाय या दोन दिवसांमध्ये लाकडी साहित्यांचा होतो. त्यामुळे या यात्रेचे वैशिष्ट्य हे लाकडी साहित्याची यात्रा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
जालना शहरात आनंदी स्वामी महाराज यांच्या नावाने एक आनंदी स्वामी गल्ली आहे जसं नाव आहे तशीच ती गल्ली ही छोटीशी आहे. परंतु याच गल्लीत आषाढी एकादशीनिमित्त भरल्या जाणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून लाखों रुपयांची उलाढाल होते. शहरातील बरवार समाज या लाकडी साहित्याची निर्मिती करतो. डिजिटलचा जमाना असला तरी आजही लहान मुलांना चालायला शिकवणारा पांगुळगाडा याच यात्रेत मिळतो. बैलांअभावी आपल्यालाच बैल बनवणारी बैलगाडी देखील याच यात्रेत मिळते. खेळण्याचे दुर्मिळ साहित्य इथे उपलब्ध आहे. याच सोबत गृहिणींना स्वयंपाक घरात आवश्यक असणारे लोटाळणे ,पोळपाट, यापासून ते थेट देवघरापर्यंत देवाला बसायला लागणाऱ्या पाटापर्यंत सर्व काही लाकडाचे साहित्य इथे मिळते. म्हणूनच की काय बरवार समाज या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतो. घरातील लहान असो अथवा थोर कोणताही व्यक्ती या यात्रेच्या दिवसात घरी थांबत नाही. वर्षभराचा व्यवसाय या यात्रेत होतो. वृद्धांना ही खेळणी पाहून त्यांचे बालपण आठवते तर बालकांना आधुनिक काळातील चार्जिंग वर चालणाऱ्या खेळण्या व्यतिरिक्त दिसणारी ही लाकडी खेळणी पाहून कुतूहल वाटतं. अशीही लाकडी साहित्याची यात्रा सर्वांनाच आनंदी आनंद देऊन जाते.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com