जालना- परीक्षेच्या वेळेपूर्वी अवघ्या दहा मिनिटात परीक्षा केंद्र बदलल्यामुळे येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला आहे.
बुधवार दिनांक 18 रोजी दुपारी दोन वाजता या महाविद्यालयातील बीएससी बायोटेक्नॉलॉजी प्रथम वर्षाच्या परीक्षा होती. या परीक्षेसाठी हे विद्यार्थी दीड वाजताच बारवाले महाविद्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना एक वाजून 40 मिनिटांनी परीक्षा केंद्र हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा अवघ्या काही मिनिटातच बारवाले कॉलेजेच केंद्र असल्याचे सांगण्यात आले आणि पुन्हा एक वाजून पन्नास मिनिटांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय हेच परीक्षा केंद्र असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान परीक्षेची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी Edtv jalna News प्रतिनिधीशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटातच हा प्रतिनिधी राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात पोहोचला. तिथे प्राचार्य श्रीमती सुनंदा तिडके आणि उपप्राचार्य सोमीनाथ खाडे यांना या केंद्राविषयी विचारले असता त्यांनी केंद्र संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही असे सांगितले. त्याच वेळी खात्री करण्यासाठी त्यांनी बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सुरेश कागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारवाले महाविद्यालयाचे विद्यार्थी तुमच्या महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी येत असल्याचे सांगितले, तसेच विद्यापीठाने तुमच्या आयडी वर प्रश्नपत्रिकाही पाठवली आहे असे सांगून ती डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना द्या अशा सूचना केल्या. दरम्यान एक वाजून 55 मिनिटांनी बारवाले महाविद्यालयाचे विद्यार्थी धापा टाकत या महाविद्यालयात पोहोचले परंतु त्यांच्याकडे कुठलेच हॉल तिकीट नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना बसवायचे कसे? या कारणामुळे विद्यालयात देखील गडबड सुरू झाली. शेवटी कसेबसे या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये बसवले आणि परीक्षा सुरू झाली.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172