जालना-राज्य शासन विविध कल्यााणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे असल्याचे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आज आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून, ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जागतिक वसुंधरा दिन’ निमित्त पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 22 एप्रिल ते महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत सर्वांनी आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, पाण्याचे विविध स्त्रोत साफ केले आहेत. नद्या, नाले, तलावांची स्वच्छता केली. तसेच जालना शहरातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे काढून नदीची स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत असल्याच त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी प्रारंभी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक, निंदनीय भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निरापराध नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्यास सामर्थ्य मिळो
यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगत, या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तसेच निरापराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवता विरोधी कृती आहे असल्याचे सांगुन अशा भ्याड हल्याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version