जालना -न्यायालयात अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्यांसंदर्भात झटपट न्याय मिळावा या उद्देशाने दिनांक 7 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षकारांनी या अदालतीमध्ये आपले खटले मांडावेत आणि वेळ पैसा वाचून आपापसातील भांडणे तडजोडीने मिटवून मैत्री कायम ठेवावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणूप्रसाद पारवेकर यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये 7 मे रोजी प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसानभरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वाद, भूसंपादन आणि एकूणच सर्व प्रलंबित प्रकरणाविषयी न्यायनिवाडा केला जाणार आहे.
त्यासाठी दोन्ही पक्षकारांची संमती आवश्यक आहे. दोन्ही पक्षकारांनी अहंभाव बाजूला ठेवून या न्यायालयात न्याय मिळवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. पक्षकार प्रकरण निकाली काढण्यासाठी थेट संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरन किंवा त्यांच्या वकिलांमार्फत देखील लोक अदालतीमध्ये येऊ शकतात. तडजोडीने आणि पूर्ण पारदर्शकपणे या प्रकरणांचा निवडा ही केले जाणार आहे. 7 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता लोक न्यायालयाला सुरुवात होणार असल्याचेही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणू प्रसाद पारवेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 02482-223625 आणि 8591903621 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
https://edtvjalna.com