जालना -मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी दिली आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे काम ग्रामपंचायत , पंचायत समिती, जिल्हा परिषद, अशा विविध टप्प्यांवरअडकून पडते. दप्तर दिरंगाई मुळे या कामात हलगर्जीपणा होतो, आणि कर्मचारी वेळेवर भेटत नाहीत त्यामुळे जनतेची कामे खोळंबून राहतात, नाहक जनतेला पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो.
या बाबी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी बारा ते दोन या वेळेत तक्रार निवारण दिन आयोजित केला आहे. या तक्रारी निवारण्यासाठी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जनतेच्या तक्रारींचा सोक्षमोक्ष त्याच वेळेस लावल्या जाण्याची शक्यता आहे. कदाचित कागदपत्रांअभावी काही तक्रारींचा निपटारा राहिला तर पुढील पंधरा दिवसांमध्ये त्या मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
https://edtvjalna.com/2022/7427/