जालना- पावसाळा तोंडावर आला आहे परंतु त्यापूर्वीच अवकाळी पावसाने हा -हा -कार माजवला आहे. त्यातच पुणे वेधशाळेने यावर्षी 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे आणि या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या एकूण 47 गावांना पुराचा धोका आहे. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून यावेळी नदीकाठी असलेल्या नवीन 176 गावांची देखील माहिती आपत्ती व्यवस्थापनाने तयार ठेवलेली आहे.
पुरामुळे धोका असलेल्या नद्यांची नावे पुढील प्रमाणे जालना- कुंडलिका, भोकरदन- मध्ये धामणा रायघोळ, केळना, या नदीकाठच्या तीन गावांना. जाफराबाद मध्ये केळणा नदीमुळे कोनड, आणि निमखेडा या दोन गावांना धोका संभवतो. परतुर तालुक्यात गोदावरी काठी पाच गावे आहेत. त्यामध्ये गोळेगाव, संकनपुरी, सावंगी किनारा, गंगा किनारा, चंगतपुरी आणि सावरगाव बुद्रुक यांचा समावेश आहे .मंठा तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळे देवठाण, उसवद, हनुमंत खेडा, आणि कानडी या तीन गावांना पुराचा धोका संभवतो. जालना जिल्ह्यात सर्वात जास्त गावे ही घनसावंगी तालुक्यात आहेत. त्यामध्ये भादली, शिरसवाडी, राजा टाकळी, मंगरूळ ,मुद्रे गाव, रामसगाव, गुंज, बानेगाव, सौंदलगाव ,लिंगसेवाडी, उक्कडगाव, शिवणगाव, जोगलादेवी ,भोगगाव, शेवता, कोठी, पांढरी वस्ती, श्रीपत धामणगाव, या 18 गावांचा समावेश आहे. तर अंबड तालुक्यात गोदावरी मुळेच 16 गावांना धोका संभवतो त्यामध्ये गोरी, अंधारी, डोमलगाव, वाळकेश्वर, कुरण, गोंदी, गंगा चिंचोली ,साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रुक, हसनापूर ,कोठाळा, इंदलगाव, साडेगाव, या 16 गावांचा समावेश आहे. तर बदनापूर तालुक्यातील एकाही गावाचा आपत्तीमध्ये समावेश नाही.
आपत्ती व्यवस्थापनाने नदीकाठच्या 176 गावांचीही माहिती तयार ठेवली आहे. त्यामध्ये जालना तालुक्यात 28, बदनापूर मध्ये 17, भोकरदन 36, जाफराबाद 14, परतुर 15, मंठा 10, अंबड 32 आणि घनसावंगी 24,अशा गावांचा समावेश आहे .येणाऱ्या आपत्तीशी तोंड देण्यासाठी जालना महानगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर चार नगरपालिका आठ तहसील आणि एक जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी असणाऱ्या किट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत .या किटमध्ये झटपट तयार होणारा तंबू ,लाईफ जॅकेट ,बोट, ऑक्सीजन सिलेंडर ,स्ट्रेचर, हेल्मेट, फायर सुट, याचा समावेश आहे. आपत्ती फक्त नद्या नाल्यांच्या पुरा संदर्भातच नव्हे तर मोठ-मोठे झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक घरांचेही नुकसान होते. ती देखील आपत्तीच मानल्या जाते त्यामुळे अशावेळी हीच ही झाडे कापण्यासाठी तसेच स्लॅब कोसळल्यास ते कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कटरचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यासोबत जंगली पशु पक्षांना वेगवेगळ्या आवाजाने दूर ठेवण्यासाठी बंदुकीचा देखील यामध्ये समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्तीमध्ये संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे हे आवाहन करण्यात आले आहे.
-दिलीप पोहनेरकर-9422219172