जालना- परतुर चे नगराध्यक्ष ,परतूर तालुका शिवसेनाप्रमुख, परतुर -मंठा विधानसभेचे आमदार, जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, अशी वेगवेगळी पदे भूषविलेले सुरेशकुमार जेथलिया हे उद्या शनिवार दिनांक 15 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये परतुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. खरंतर पक्षांतराचा इतर पक्षात उड्या मारण्याचा हंगाम म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पूर्वीचे सहा महिने असा असतो. परंतु आता निवडणुका झाल्यानंतर हे पक्ष प्रवेश का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे आणि यासंदर्भात स्वतः माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिलं आहे.पहा…
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे सुरेश जेथलिया यांनी बंड करून अपक्ष निवडणूक लढवली होती .त्यामुळे काँग्रेसने देखील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला परतुर तालुका यावेळी शिवसेनेच्या मदतीने निवडून येण्यासाठी अनुकूल होता. परंतु शिवसेनेच्या दादागिरी पुढे काँग्रेसची डाळ शिजली नाही आणि मागच्या दाराने येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवली .त्यापूर्वी काँग्रेसने आपला दावा केलेलाच होता. एवढेच नव्हे तर प्रचाराच्या साहित्याची देखील जुळवा जुळव केली होती आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरेश जेथलिया यांना आश्वासन देऊन गप्प बसवले होते. परंतु बोराडे यांनी अर्ज मागे घेतला नाही आणि पर्यायाने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि काँग्रेस या दोघांची युती असतानाही पक्षात फूट पडली आणि इथे स्वतंत्र निवडणुका लढवल्या गेल्या.
या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांचाही पराभव झाला आणि अपक्ष उमेदवार सुरेश जेथलिया यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले . निवडून आले ते भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अधिकृत तिकीट देऊनही बोराडे यांचा पराभव झाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच जालन्यात येऊन गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बोराडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. सुरेश जेथलिया हे तर पूर्वीच काँग्रेस पासून दूर गेले होते त्यामुळे आता परतुर मंठा विधानसभा मतदारसंघातून ना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला प्रतिनिधी आहे ना आता काँग्रेसला कोणी प्रतिनिधी आहे. त्यामुळे पुन्हा आता या दोन्ही पक्षांना नवा गडी नवा राज अशा पद्धतीने शोधा शोध सुरू करावी लागणार आहे. परंतु विधानसभेच्या माध्यमातून एक मात्र खरे की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि काँग्रेसचे या मतदारसंघातून आता” तेलही गेले तूपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले एवढेच.”
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172