जालना;  कोणताही नवीन उपक्रम येणार म्हटलं की त्याच्यात राजकारण आणि उद्योजकांचा हात नसेल तरच नवल!.नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गात देखील राजकीय हवे- दावे आडवे आले. याचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला तर काही शेतकऱ्यांना फटका बसला. कोरडवाहू शेती बागायती दाखवून दोन, हैदराबाद येथून झाडे आणून दोन वर्षांपूर्वी इथे बागायती केल्याचे दाखवल्या गेले आणि  लाख रुपयांच्या जमिनी कोट्यावधीमध्ये गेल्या. यामध्ये देखील पंचनामा करणाऱ्या तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत  वाटा -घाटी झाल्या. त्यानंतर जालना शहराला लागूनच खरपुडी येथे सिडको चा प्रकल्प येऊ घातला होता ,त्यावेळी देखील उद्योजकांनी शेतकऱ्यांची कवडीमोल भावाने शेती घेऊन सोन्याच्या भावाने ती सिडकोला देण्याचे ठरवले होते .परंतु ज्या शेतकऱ्यांनी शेती विकली त्यांच्या नंतर हे सगळं राजकारण आणि उद्योजकांची खेळी आल्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गळफास घेणे पसंत केले. कारण एकीकडे हातातून शेती गेली होती तर दुसरीकडे या भावामध्ये शेती मिळत नव्हती. दहा वर्षांमध्ये जालन्यात आणखी एक प्रकार तसाच होत आहे तो म्हणजे जालना -नांदेड समृद्धी महामार्गाचा.

रामनगर, देवमूर्ती ,पानशेंद्रा, या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या समृद्धी महामार्गासाठी जात आहेत. तीन वर्षांपूर्वी मोजणी करून खुणा करून ठेवलेल्या या जमिनीचे पुढे काय झाले हे कोणीच अधिकारी सांगायला तयार नाहीत. परंतु शासनाने या जमिनींना पूर्वीचेच भाव लागू केले आहेत. खरंतर ज्यावेळेस खरेदी करायची त्यावेळेस चे भाव लागू होणे अपेक्षित आहे. परंतु शेतकऱ्यांना आता हे तीन वर्षांपूर्वीचे भाव मान्य नाहीत .तसेच आज एखादा भाव ठरवला तर तो आजच्यासाठी आहे चार वर्षांनी त्या भावात जमीन द्यायची कशी हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे? या सर्व प्रकाराला वैतागून मागील वर्षभरामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासनाला भिक देण्याचे  आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  दिले, रास्ता रोको केले. परंतु शासनाला काही घाम फुटेना. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत असतानाच खरपुडी येथे होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पाला मात्र जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांनी पायघड्या टाकून या जमिनीचे हस्तांतरही सुरू केले आहे आणि त्यांना मावेजादेखील दिला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे, त्यांना वेठीस धरायचे आणि त्यांच्याकडून अल्प दरात रस्त्यासाठी शेतीचे संपादन करून त्यांना वाऱ्यावर सोडायचे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची शेती घेऊन ती सिडकोला विकणाऱ्या उद्योजकांना ते मागतील तेवढ्या भावाने मावेजा वाढवून द्यायचा, हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला वैतागून देवमूर्ती येथे 32 एकर जागेत गोशाळा असलेल्या दिलीप राठी यांनी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत दिला आहे . त्यातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालन्यात आहेत, त्यामुळे या  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी देखील हा प्रयत्न सुरू आहे .एकंदरीत दिलीप राठी यांनी या सर्व प्रकाराला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना जबाबदार धरले आहेत. कारण ते या जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि जमिनीचे हस्तांतरणामध्ये या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी म्हणून ते सिडकोच्या जागेचे हस्तरण हस्तांतरण करू शकतात त्यांना मावेजा देऊ शकतात, तर शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गप्प का ?असा प्रश्न उपस्थित करत माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हेच जबाबदार असतील असा इशाराही दिला आहे.

सिडको साठी संपादित केलेल्या पाच हेक्टर जमिनींना रेडीरेकनर प्रमाणे पाच कोटी 50 लाख रुपये दर आणि मूल्यांकन निश्चित केलेले असताना आजच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळे बाजारमूल्य दाखवून 21 कोटी 17 लाख 21 हजार 250 रुपयांचा भाव दिला जात असल्याचा आरोपही दिलीप राठी यांनी केला आहे.

 

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version