जालना- आपल्या गुरूंचा गौरव वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन साध्वी सिद्धीसुधाजी म.सा.यांनी केले. जालना शहरात श्री गुरु गणेशलालजी म.सा .यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त समारोपाच्या दिवशी त्या आज बुधवार दिनांक 29 रोजी बोलत होत्या.  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ असलेल्या श्री गुरु गणेशलालजी म.सा .यांच्या समाधीस्थळी आज हजारो भाविकांनी गर्दी केली होती. काल पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीड आदी ठिकाणाहून सुमारे 2000 भाविक पायी चालत आले होते, तर आज विविध भागातून आलेल्या सुमारे 50000 भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. आजच्या या समारोपप्रसंगी श्रुतमुनीजी म.सा. अरुणप्रभाजी म.सा. यांच्यासह अन्य साधू व साध्वींची उपस्थिती होती.

श्री गुरु गणेशलालजी म.सा .यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. आज या समारोपाच्या प्रसंगी जीवदयाची बोली नांदेड येथील ओम प्रकाश पोखरणा आणि शिमोगा येथील कोठारी परिवाराने प्रत्येकी सहा लाख 31 हजारात घेतली आहे. जैन साधूंनी 63 व्या पुण्यतिथी निमित्त 63 हा आकडा यावा अशी अपेक्षा केली होती त्या अनुषंगाने या दोघांनीही ही बोली घेतली आहे. दरम्यान जीवदया बोली म्हणजे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जो कलश ठेवला जातो, ज्या कलशाची पूजा केली जाते तो कलश मिळवण्यासाठी दिलेला निधी. हा निधी जीवदयासाठी म्हणजे प्राणिमात्रांच्या उपजीविकेसाठी वापरल्या जातो. विशेष करून सध्या सुरू असलेल्या गोशाळेसाठी हा निधी वापरला जाणार आहे. 400 गाईंपासून सुरू केलेली ही गोशाळा सध्या याच गोशाळेत 2700 गये आहेत तर पुढील वर्षांपर्यंत 5000 गाई सांभाळण्याचे गोशाळेचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान यावेळी मार्गदर्शन करताना साध्वी,पुढे म्हणाल्या की, गुरु गणेशलाल म.सा.यांनी भारत देशामध्ये स्वदेशीचा वापर करण्यासाठी भर दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी खादीचे भांडारही सुरू केले होते .तसेच स्वदेशी स्वाभिमान बाळगण्यासाठी स्वामी विवेकानंद जरी परदेशात गेले तरी तेथे सुद्धा त्यांनी खादी आणि आपला स्वदेशी वेशच परिधान केला होता. परंतु सद्य परिस्थिती उलटी आहे .महिला मॉलमध्ये जातात पण खादी खरेदी करत नाहीत, खरे तर खादीचा कपडा वापरणे हे आपल्या गुरूंचा गौरव वाढविण्यासारखे आहे. असा उपदेश करत असतानाच त्यांनी महिलांच्या सध्याच्या वेशभूषेबद्दल  नाराजी ही व्यक्त केली. त्या म्हणाल्या पूर्वी लग्नामध्ये किंवा भेट वस्तूमध्ये खादिचा घागरा दिल्या जायचा ,त्यानंतर साडी आली आता साडी ही सुटली आहे आणि ड्रेस आला आहे .अशा ड्रेस मधील महिलांकडे पाहून आम्हाला मान खाली घालावी लागते .अशी नाराजी व्यक्त करतच त्यांनी महिलांनी किमान धार्मिक कार्यक्रमात तरी सुती कपडे वापरावेत असे आवाहन केले. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेश कुमार सकलेचा, यांच्यासह भरतकुमार गादिया, कचरूलाल कुंकूलोळ, संजय मुथा, डॉ. धरमचंद गादिया आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version