जालना- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे शुक्रवार दिनांक सात रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पोलीस प्रशासनाची ते पाहणी करणार आहेत. या पाहणीसाठी पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असलेल्या ध्वजारोहणाच्या मैदानात भर उन्हाळ्यामध्ये वृक्षारोपण केले आहे. ते देखील 24 तासात! त्यामुळे इथे लावलेले वृक्ष किती दिवस जगतील याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे.
एकीकडे आयजी साहेबांसाठी हिरवळ अंथरली जात असताना दुसरीकडे मात्र जे पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावून रात्रंदिवस सेवा देतात त्यांच्या नशिबी मात्र स्वच्छता गृहासाठी पाणी देखील उपलब्ध नाही. पुरुषांचे ठीक आहे पण महिलांना देखील याच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे आणि स्वच्छतागृहात जाताना टमरेल घेऊन जावे लागत आहे. याही पेक्षा जास्त वेदना त्यांना होत आहेत त्या म्हणजे सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी स्वच्छतागृहात जाताना बॅटरी असलेलाच मोबाईल सोबत घेऊन जावा लागतो कारण तिथे कुठलाही दिवा लावलेला नाही. ही परिस्थिती आहे ज्याला आपण पोलीस मुख्यालय म्हणतो त्या ठिकाणची. पुरुष स्वच्छतागृहात देखील पाण्याचा ठणठणाट आहे त्यामुळे महिला आणि पुरुष दोन्ही स्वच्छतागृहांची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दीड वर्षांपूर्वीच या ठिकाणची देखभाल दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याचे ठरवले होते आणि त्या पद्धतीने कामही सुरू झाले होते. साहेबांची बदली झाली आणि कामही पूर्ण झाले असेल ते कदाचित कागदोपत्रीच.
मोटर परिवहन कार्यालयात देखील यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही गेल्या चार महिन्यांपासून मोटर परिवहन अधिकारी यांच्या खोलीची दुरुस्ती सुरू आहे परंतु अद्याप पर्यंत तिथे सातशे रुपयांचे बाजारातील अल्युमिनियमचेदार आणि प्लास्टर केलेल्या खरबड भिंतीवर रंगरंगोटी शिवाय काहीच झाले नाही. या ठिकाणी असलेल्या पुरुष शौचालयाचे तर शब्दात वर्णन होऊ शकत नाही. खरं तर हे ठिकाण महत्त्वाचे ठिकाण आहे कारण रात्री वेळ रात्री बाहेरगावाहून येणारा आणि जाणारा बंदोबस्त इंधन भरण्यासाठी इथे थांबलेला असतो त्यामध्ये महिला कर्मचारी देखील असतात परंतु त्यांच्यासाठी कुठलीही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. प्रवेशद्वाराजवळच ठेवलेली पाण्याची टाकी ही कधी स्वतःला आणि पाणी पिणाऱ्याला ‘हे राम, म्हणायला लावील हे सांगता येत नाही.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागून पोलीस कवायत मैदान, पोलिसांची निवासस्थाने ,खानावळ, मोटर परिवहन कार्यालय, याकडे एक रस्ता जातो. हा रस्ता एवढा अरुंद आहे की त्या ठिकाणाहून दोन वाहने एकत्र जाणे कठीण जाते. अशा परिस्थितीत केवळ आपण दोघेही “इज्जतदार” आहोत या भूमिकेतून भांडण होणे टाळले जाते, या रस्त्यावर लावलेल्या पथदिव्यांमधून प्रकाश पडतो हे कधी अजून या रस्त्याने पाहिलेलच नाही. त्याहीपेक्षा मोठा कहर म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ना गट्टू बसवले आहेत ना भर टाकलेली आहे. त्यातच हा खडकाळ भाग आहे त्यामुळे एखादे वाहन जर रस्त्याच्या खाली गेले तर ते वर येणे कठीण आहे आणि खाली गेल्यानंतर कर्मचारी जखमी होणार नाही असेही होणार नाही. याच रस्त्याने महिला पोलीस कर्मचारी आपल्या मुलाबाळांना घेऊन अनेक वेळा प्रवास करतात.
पोलीस कवायत मैदानासमोरच असलेल्या दुसऱ्या एका मैदानाच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे, ती आजही सुरू आहे. त्यामुळे हे काम खूप “गुणवत्ता पूर्ण” होत आहे असे वाटायला नको. तुमच्या हाताच्या अंगठ्याने देखील या दगडावर मारलेले सिमेंट उकरले तर माती होऊन खाली पडायला लागला आहे. एकीकडे पोलीस महानिरीक्षकांसाठी हिरवळ अंथरली जात असताना दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर अहोरात्र पोलीस प्रशासन दुसऱ्यांच्या संरक्षणाची काळजी घेते त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाचे मात्र अधिकाऱ्यांना काही सोयर सुतक नाही. सविस्तर चित्रीकरण पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172