बदनापूर-तालुक्यातील महत्त्वाचे असलेले सोमठाणा येथील दुधना मध्यम प्रकल्प, वाल्हा येथील सोमठाणा प्रकल्प, राजेवाडी येथील लघु प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे वाल्हा येथील प्रकल्प बनवल्यापासून म्हणजेच चौदा वर्षानंतर पहिल्यांदा संपूर्ण भरला आहे. तिन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पर्यटकांची ही गर्दी होत आहे. त्यातच covid-19 मुळे बंद असलेली मंदिरे लवकरच उघडणार आहेत, आणि या तलावाच्या माथ्यावर रेणुका मातेचे सोमठाणा हे संस्थान आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये देवदर्शना सोबतच पर्यटकांना दुधना मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या फेसाळत्या दुधाळ पाण्याखाली आंघोळ करण्याचा मनसोक्त आनंद लुटायला मिळणार आहे. हे तिन्ही प्रकल्प एकमेकास जोडल्यास तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार होऊ शकतो परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम लालफितीत अडकले आहे.
दरम्यान, सोमठाणा येथीलअप्पर दुधना प्रकल्प व वाल्हा येथील धरण या दोन्ही धरणामधील अंतर अडीच किलोमीटर असून या दोन्ही धरणातील पाणी एकमेकांना जोडून साठा वाढवून शाश्वत योजना मात्र अद्यापही धूळ खात पडून आहे. दोन्ही तलावाची जोडणी करण्याची योजना २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रंगानायक आणि तत्कालीन तहसीलदार बालाजी क्षिरसागर यांनी आखून तसा प्रस्ताव जालना लघु पाटबांधारे कार्यालयास पाठविला होता, परंतु दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर प्रस्तावामाधील त्रुटींची पूर्तता न झाल्याने व सदर कार्यालयाने प्रस्ताव शासनास न पाठविल्याने धूळ खात पडला असून आहे. सदर प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील पाणीटंचाईसह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्ठात येणार आहे.
सोमठाणा, वाल्हा व राजेवाडी धरणाची जोडणी करण्यासाठी प्रस्तावात आलेल्या अडचणीच्या अनुषगाने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये कार्यकारी अभियंता पाटबंधारे जालना यांना पत्र देऊन माहिती मागितली होती परंतु या कार्यलयाने २९ जानेवारी २०१८ रोजी अपूर्ण व मोघम स्वरूपाची माहिती लघु पाटबंधारे विभागास पाठविल्याने या विभागाने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या कार्यालयाने अपूर्ण व त्रोटक स्वरूपाची माहिती पाठविल्याने अहवाल तयार करणे अशक्य असल्याने जोडणीचा प्रस्ताव शासनास पाठविता येत नाही असे कळविले, सदर पत्र पाटबंधारे विभागास २३ मार्च २०१८ रोजी प्राप्त झाले तदनंतर कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांनी उपविभाग बदनापूर यांना पत्र देऊन सविस्तर माहिती पाठविण्याची सूचना दिली मात्र दोन वर्ष उलटले तरी बदनापूर उपविभागाने अद्याप माहिती पाठविलेली नसल्याने प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे.