जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची जालना येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून तर मंगल धुपे यांची जळगाव येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. दरम्यान कैलास दातखिळ यांच्या जागी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघरच्या श्रीमती संगीता चंद्रकांत भागवत या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदलून येत आहेत. या संदर्भातील आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो.बा. ताशिलदार यांनी दिनांक 30 मे रोजी जारी केले आहेत.
जालना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची कारकीर्द जालन्यात येण्यापूर्वीच वादग्रस्त होती .लातूर येथे प्रशिक्षणार्थी शिक्षणाधिकारी असताना लाचलूच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये कैलास दातखीळ आणि त्यांचे एक सहकारी सुधाकर पेठे या दोघांना साठ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी दातखीळ यांच्या घराची झडती घेतली असता तिथेही एक लाख रुपयांची रोकड सापडली होती .त्यानंतर ते जालन्यात 6 वर्षा पूर्वी बदलून आले आणि इथेही वादग्रस्त कारकीर्द सुरू झाली. विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करणे आणि मर्जीतील शिक्षकांना शाळेवर न पाठवता सोबत घेऊन फिरणे, आपल्याच दालनात खुर्चीच्या बाजूलाच खुर्ची टाकून त्यांच्या सल्ल्यानुसार प्रशासन चालवणे, त्याचसोबत वरिष्ठांची दिशाभूल करून मनमानी निर्णय घेण्याबाबत त्यांना अनेक वेळा वरिष्ठांनी नोटीस बजावलेल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी देखील त्यांची चौकशी करण्याची सूचना तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना दिल्या होत्या परंतु ते आदेशच दातखिळ यांनी दाबून ठेवले. शेवटी श्रीमती मीना यांच्यानंतर बदलून आलेले मुख्य कार्यकारी जगदीश मिनीयार यांनी हे प्रकरण पुन्हा पुढे आणलं आणि 24 तासाच्या आत त्या नोटीसीचा खुलासा करावा असे आदेश जारी केले. मराठा आंदोलनाच्या काळात मराठा शिक्षक आणि ओबीसी शिक्षक यांच्यामध्ये भांडणे लावण्यासाठी खतपाणी घातल्याचा आरोपही कैलास दातखिळ यांच्यावर आहे .परतूर येथे नुकतेच शिक्षकाने हडप केलेल्या शिक्षकांच्याच आयकर च्या रकमे संदर्भात घडलेला प्रकार देखील कैलास दातखील यांच्या दुर्लक्षामुळेच झालेला होता.
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे यांच्या विरोधात देखील अनेक संघटना आणि शिक्षकांनी निदर्शने केली . गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री महावीर स्थानक जैन श्रावक संघाच्या शिक्षकांबद्दलची प्रकरणे विशेष गाजली. कार्यालयात दुपारनंतर येण्याचा त्यांचा विषय विशेष वादग्रस्त ठरला. यातूनच शिक्षक संघटनांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे संघटना त्यांना भेटायला गेल्यानंतर अरेरावीची भाषा वापरून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे सुतवाचक चांगलेच वादग्रस्त ठरले. त्यामुळे या संघटनांनी छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर देखील आंदोलने केली होती. महिला शिक्षणाधिकारी असल्यामुळे फारसे कोणी त्यांच्यासोबत वाद घालत नव्हते ,
त्यामुळे अनेक संस्थाचालक आणि शिक्षक देखील त्यांच्यावर कायम नाराजी दर्शवित होते. दरम्यान श्रीमती धुपे या साहित्यिक, कवयत्री असल्यामुळे कवी संमेलने आणि साहित्य संमेलनाला त्या आवर्जून उपस्थित राहत होत्या. जालना जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या जागी पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता चंद्रकांत भागवत या बदलून येत आहेत. त्यांची कारकीर्द कशी असणार आहे हे येणारा काळच ठरवेल .परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या झालेल्या रिक्त जागेवर अद्याप पर्यंत कोणाचीही नियुक्ती केल्या गेलेली नाही. त्यांच्या जागी सध्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांमधून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://youtube.com/@edtvjalna5167
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
www.edtvjalna.com-दिलीप पोहनेरकर,9422219172