जालना- जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक चार रोजी जालना शहरा बाहेरील औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडली. शहराच्या बाहेर हे ठिकाण असल्यामुळे या परिसरात कुठलीही चहा पाण्याची किंवा अल्फोपाराची देखील व्यवस्था नव्हती .त्यामुळे इथे मतमोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना उपाशीपोटीच काम करावे लागले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नाष्टा आणि दुपारी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. ही सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली होती, परंतु पुरवठाधारकावर कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे ही सर्व यंत्रणा कोलमडली. सकाळी नाश्त्यामध्ये दिलेला उपमा प्यायचा की खायचा? हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा केल्या गेली आणि तो खाण्यासाठी देण्यात आला. परंतु या उपम्यामधील रव्याची ढेकळे शीजने तर सोडाच फुटली सुद्धा नव्हती. त्यानंतर दुपारी एक वाजता सुरू झालेले जेवण दीड वाजता संपून गेले आणि अनेक कर्मचाऱ्यांना उपाशी राहावे लागले. प्रशासनाच्या वतीने टेबलवर जेवण देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली परंतु भांड्यातच नाही ते ताटात काय येणार? अशी परिस्थिती निर्माण झाली. भोजन कक्षातच अन्न शिल्लक नव्हते तर ते टेबल पर्यंत जाणार कसे? हा सर्व गोंधळ पाहिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी रिकामेत्रेवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी भोजन कक्षात येऊन पाहणी केली मात्र तिथे उद्भवलेला परिस्थिती पुढे ते देखील हतबल झाले. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्हा प्रशासन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये या ब्रीदवाक्यात जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांनीच बदल केला आणि “उत्सव निवडणुकीचा, अपमान कर्मचाऱ्यांचा” असे केले. सविस्तर वृत्तांत पाहण्यासाठी व्हिडिओ बघा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172