जालना- शासनाने विविध विभागांमध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून दिनांक 9 जुलै 2024 रोजी अध्यादेश काढून वेगवेगळ्या पात्रतेप्रमाणे युवा कार्य प्रशिक्षणार्थींची भरती केली होती. भरती करतानाच त्यांना सहा महिन्याचा कालावधी असल्याचेही निश्चित केले होते. हा कालावधी लवकरच संपणार आहे. परंतु आपल्या हातचे काम जाईल या भीतीने या तरुणाईने आतापासूनच सरकार दरबारी विनवणी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या समूहाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यांनी वाढवून द्यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये सुमारे 1200 असे कार्य प्रशिक्षणार्थी आहेत जे मानधन तत्वावर शासन दरबारी काम करतात. त्यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, 12 वी पास आणि डिप्लोमा होल्डर असेल तर आठ हजार रुपये आणि पदवीधर असेल तर दहा हजार रुपये अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे मानधन ठरवलेले आहे. या मानधनाच्या भरोशावर अनेक तरुणांनी आपले पुढील नियोजनही सुरू केले आहे. परंतु आता हा कालावधी संपुष्टात येणार असल्यामुळे त्यांच्यासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.आज निवेदन देण्यासाठी पूनम साळवे, कविता धांडे, मनीषा टापरे, करण मगर, किशोर डोईफोडे, लहू शेळके, सुखदेव भिसे, सागर खरात पूजा बोरुडे, दीपाली कळवणे, मोनाली उईके, आनंद तारक, अखिल शेख, मयुरी तुपे, मनोज गारखेडे आदींची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172