जालना- जालना शहरातील कुंडलिका- सीना नदीचा प्रश्न असो अथवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथील गाळ उपशाचा प्रश्न असो, त्यासोबत पारशी टेकडीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न असो ,शहरातील उद्योजक, व्यापारी,नागरिक आणि सामाजिक संस्था एकत्र येत गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. परंतु त्यांना प्रशासनाकडून, जालनाच्या नागरिकांकडून अपेक्षित असलेली मदत मिळत नाही . नदीमध्ये कचऱ्याचे गाठोडे निर्माल्य इतर घाण टाकू नये म्हणून सामाजिक संस्थांनी जाळी लावलेली असतानाही गोळा फेक करत नागरिक या जाळीच्या वरूनही कचरा फेकत आहेत . नदीपात्रात विविध ठिकाणी भराव टाकून अतिक्रमण केल्या जात आहे . नाल्यांवर मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत . या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी या संस्था पूर्वी सत्ताधाऱ्यांकडे मदत मागत होत्या. परंतु सत्ताधाऱ्यांना मदत मागितली तर ते पुन्हा उद्योजकांकडेच पाठवतात. त्यामुळे ही मदत मागणे ही आता बंद झाले आहे विरोधकांचा तर विषयच नाही ,आणि जिल्हा प्रशासन सत्ताधारी आणि राजकारणाच्या दबावापुढे झुकलेले आहे .त्यामुळे एकाकी जालनेकर आणि सामाजिक संस्था एकाकी झुंज देत आहेत. पर्यायाने या तिघांनाही जागृत करण्याचे आणि त्यांना त्यांची जबाबदारीची आठवण करून देण्याचे काम या संस्था विविध मार्गाने नेहमीच करत आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गांधीजींच्या “त्या” तीन माकडांचा व्हिडिओ पुन्हा नव्या रूपाने या सामाजिक संस्थांनी समाज माध्यमांवर टाकला आहे. बुरा मत सुनो ,बुरा मत देखो ,बुरा मत कहो, असा संदेश देणारी ही तीन माकडे साधारणतः 40 ते 50 वर्षांपूर्वी गांधीजींची माकडे म्हणून प्रसिद्ध झाली होती. आता हीच तीन माकडे जिल्हा जिल्हा प्रशासन सत्ताधारी आणि विरोधक हे कसे कान, तोंड आणि डोळे बंद करून बसले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
