जालना- जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज सतकर कॉम्प्लेक्स समोरून असणाऱ्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाचा ताफा सकाळी दाखल झाला. दरम्यान नूतनवसाहतीचा भाग सोडून विद्युत कॉलनीच्या कोपऱ्यापासून ते जयनगर पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढायला मनपा ने सुरुवात केली आणि ती देखील एका टोकापासून न करता मधलीच घरे पाडायला सुरुवात केल्यामुळे चांगला तणाव निर्माण झाला होता. नागरिक देखील संतापले होते. शहरांमधील विविध भागात रस्त्यांच्या मधोमध विजेचे खांब , मोठाली झाडे आहेत ज्याच्यामुळे जीवघेणे अपघात होत आहेत. ते मनपाला दिसत नाही का ?मग रस्त्याच्या बाजूला आणि अडथळा नसलेली घरेच बरे यांना दिसतात असा संतप्त सवाल देखील या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान या रस्त्यावर दोन मजली -तीन मजली मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि चार दिवसांपूर्वीच मनपाच्या पथकाने येथे मोजणी करून खुणा ही केलेल्या होत्या. त्यावेळी अनेक घरे अतिक्रमणात जात नव्हती परंतु आज पुन्हा या पथकाने मोजणी केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत .वारंवार मोजणी करून मुद्दाम घरे अतिक्रमणात दाखवण्याचा मनपाचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच जालना शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण या आपल्या पथकासह रेवगव रोडवर दाखल झाल्या. यावेळी बोलताना सुप्रिया चव्हाण म्हणाल्या की “आम्ही पाच डिसेंबरलाच येथील रहिवाशांना नोटीसा बजावलेल्या आहेत ,आणि नोटीस दिल्यानंतर संबंधिताने ते अतिक्रमण 24 तासात काढून घ्यायला हवे .परंतु तसे न केल्यास महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 231 अन्वये हे अतिक्रमण काढून घेण्याचा अधिकार मनपायुक्तांना आहे आणि झालेला खर्च जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे अतिक्रमण धारकाकडून देखील वसूल केल्या जाऊ शकतो.”
अतिक्रमणाची मोहीम सुरू असतानाच नागरिकांनी मात्र नरमाईची भूमिका घेत अतिक्रमण असेल तर ते काढण्याला आमचा विरोध नाही, परंतु ते कुठल्यातरी एका टोकापासून सुरू करायला हवे मधलीच घरे पाडून मनपा प्रशासनला काय साध्य करायचे आहे? असा सवालही त्यांनी केला.
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172