जालना- झाडांची पालवीगळून नवीन लुसलुशीत पालवी फुटायला लागली की समजावं चैत्र महिना आला. ठिकठिकाणी आणि सहजासहजी दिसणारा कडुलिंबाचा मोहर याची आठवण करून देतो. किंबहुना चैत्र महिन्याचे ते वैशिष्ट्यच आहे. हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात होते आणि त्यासोबतच आणखी एक सुरुवात होते ती रामनवमीच्या महोत्सवाला. जगभरात ठीक ठिकाणी अनेक श्रीरामांची मंदिर आहेत आणि प्रत्येकाचं काही ना काही वेगळं महत्त्व आहे .असंच एक अनन्यसाधारण महत्त्व असलेलं जालन्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेले आनंदवाडी येथील श्रीराम मंदिर.
महारुद्राचे अवतार समजल्या जाणाऱ्या श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ते येथील श्रीरामांच्या मूर्तींची स्थापना झाली आहे. सुमारे 130 वर्षांपूर्वी त्यावेळी नाम प्रचार करत असताना मिळालेल्या भिक्षेमधून त्याकाळी 60 हजार रुपये खर्च करून श्रीरामांचा सभामंडप म्हणजे मूळ मंदिर उभ करण्यात आलं .आजही अत्यंत सुस्थितीत आणि आकर्षक कलाकृतीचा नमुना असलेले हे मंदिर भाविकांना आकर्षित करतं. 1917 ते 1924 या कार्यकाळात या मंदिरासाठी भिक्षा मागण्यात आली होती .1895 चे चैत्र महिन्यामध्ये श्रीराम ,सीता आणि लक्ष्मणांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती आणल्या गेल्या आणि त्यांची स्थापना केली .त्यावेळी पासून इथे आजही अखंड काकड आरती, माध्यम पूजा, उपासना, शेजारती या सेवा सुरू आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून श्री. रामनवमीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. रोज सकाळी रामायण ,दुपारी महाप्रसाद , दुपारी दीड ते दोन हजार भाविक महाप्रसाद घेतात .सायंकाळी किर्तन, संध्याकाळी श्रीरामांची मिरवणूक, असे भरगच्च कार्यक्रम असतात. भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून जाते. संध्याकाळी उपासना झाल्यानंतर श्रीरामांच्या मूळ मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरा बाहेर आणल्या जातात. वर्षभर ज्या मूर्तींना आपण दुरून पाहतो त्या मूर्तींचा पदस्पर्श करण्याची संधी या नऊ दिवसात मिळते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री. आनंद सागर महाराज ,श्री. रामानंद महाराज, श्री. प्रल्हाद महाराज यांनी १३ कोटी नामजपंची अनुष्ठाने याच मंदिरात केली आहेत .त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिराच्या परिसरात गोशाळा ,सभामंडप, बाहेरून येणाऱ्या सद्गुरु भक्तांची निवासाची व्यवस्था आहे. श्रीक्षेत्र गोंदवले येथील संस्थानाच्या नियंत्रणाखाली येथील कामकाज चालते. मंदिराचे महत्त्व, मंदिराचा इतिहास, सांगितला आहे श्रीराम मंदिर संस्थांचे विश्वस्त वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांनी.
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.