जालना – शहरात जुन्या जालन्यातील नूतन वसाहत आणि नवीन जालन्यातील बडी सडक हे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. दरम्यान या दोन्ही रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि या रस्त्यांचे नूतनीकरण तर सोडाच हे खड्डे बुजवण्याचा त्रासही नगरपालिका घेत नाही . जर बुजवले तर त्यामध्ये माती मिश्रित मुरूम टाकल्या जातो. त्यामुळे खड्ड्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना आणखीनच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
या प्रश्नाला हात घालत ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज नूतन वसाहत रस्त्यावर अनोखे आंदोलन केले. खरंतर या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य नागरिक यांना जावेच लागते. कारण हा रस्ता पुढे पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन विश्रामगृह, तहसील यांना जोडलेला आहे .तसेच तो पुढे बीड- सोलापूरकडेही जातो .त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडलेले आहेत. वारंवार पालिकेला निवेदन देऊनही हे खड्डे न बुजवल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली.
दरम्यान खड्डे मोजण्याची स्पर्धा यावेळी घेण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी पाळणा गाऊन या खड्ड्यांचे नामकरण केले आणि मोजणीही केली. मोजणीनंतर बक्षीसांचे वाटप करण्यात आले. जास्तीत जास्त खड्डे मोजणाऱ्याला प्रथम क्रमांकाचे 1001 रुपयांचे बक्षीसही यावेळी देण्यात आले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com