जालना- कामगारांच्या कल्याणासाठी असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, म्हणजेच कामगार कार्यालय. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या बाजूला एक भली मोठी इमारत या मंडळाची आहे. इमारत जशी बाहेरून झकपक तशी आत मध्ये देखील झपक आहे, परंतु ती फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीच आहे .सुसज्ज फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा ,वेगवेगळे कॅबिन, अशी सर्व यंत्रणा आत मध्ये आहे. परंतु ज्यांच्यासाठी हे कार्यालय आहे त्या कामगारांसाठी मात्र इथे कोणतीही सुविधा नाही. कामगार म्हटले की महिला, त्यांच्यासोबत त्यांची मुलं आले, पुरुष आले, परंतु यांच्यासाठी इथे न बसायला जागा आहे न पिण्यासाठी पाणी आहे. अधिकाऱ्यांसाठी बसायला केबिन आहे, एसी आहे, खुर्ची आहे मात्र बसायलाच कोणी तयार नाही. असा विरोधाभास या कार्यालयाचा आहे.
राज्य शासनाच्या वतीने कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी मध्यान भोजन योजना सुरू करण्यात आली ती देखील वादग्रस्त ठरली आहे. ती फक्त गुत्तेदारांच्या भोजनासाठीच सुरू आहेअसा आरोप होत आहे. ,कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संच म्हणजेच कामगार पेटीचे वाटप करण्यात येते मात्र तिला देखील दलाल रुपी भुंग्यांनी पोखरले आहे. धन दांडग्या घरातील महिलांना कामगार दाखविण्याचा प्रयत्न या दलालांनी केला आहे. शुक्रवार दिनांक 20 रोजी पेटी वाटपासाठी कामगारांना बोलावले होते त्या अनुषंगाने कामगार आलेही होते ,मात्र कामगारांची वाढलेली संख्या आणि या मंडळाचे ढेपाळलेले नियोजन त्यामुळे येथे किरकोळ चेंगरा-चेंगरी झाली. त्यामध्ये दोन परिचारिकांना किरकोळ माराही लागला आहे .याची भनक थेट कामगार मंत्र्यांना लागली आणि त्यांनी लगेच कामगार अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून ही योजना पुढील आदेशान पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. हा सर्व प्रकार आज दिनांक 25 तारखेला बोलावलेल्या कामगारांना माहीतच नाही. त्यामुळे आज दहा वाजेच्या सुमारास पुन्हा कामगारांची इथे गर्दी सुरू झाली .एक वाजेपर्यंत कामगार अधिकारी अमोल जाधव आणि नोंदणी अधिकारी विवेक पाटील हे इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी आपल्या मुळाबाळांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये बसलेल्या अमित भिंगारे यांनाच धारेवर धरले. परंतु कुठलाही निर्णय घेणे आपल्या अधिकारात नाही असे सांगत त्यांनी हात झटकले आणि अमोल जाधव यांना विचारा असे सांगितले. परंतु अमोल जाधव यांनी देखील ना कर्मचाऱ्यांचे फोन उचलले, ना कुठल्या कामगारांचे फोन उचलले. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आहेत असे म्हणत कर्मचाऱ्यांनी देखील जाधव यांची सावरा सावर केली. बाहेरगावाहून आलेल्या महिला कामगारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. सोबत आणलेल्या मुला बाळांना उपाशी पोटी आणि कोरड्या पडलेल्या घशाने येथून काढता पाय घ्यावा लागला. कारण येथील गोंधळ पाहून पोलिसांनी देखील मध्यस्थी करून या कामगारांना कामगार कार्यालय अधिकारी कार्यालयातून काढता पाय घ्यायला लावला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता दाखवला. दरम्यान कामगारांच्या या पेट्यांचा पुरवठा करणाऱ्या गुणिका कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो अलाईड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कारखान्यांना पुढील आदेश देईपर्यंत या पेट्यांचा पुरवठा थांबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पेट्या वाटप रद्द झाल्याचा कोणताही संदेश कामगारांना न गेल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. भविष्यातही संबंधित कामगारांना जर योग्य सूचना दिल्या गेल्या नाहीत तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
-9422219172