जालना -दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पळशी या गावच्या राहुल मारुती ढगे (वय 31) या जवानाचा रात्री रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान प्राप्त माहितीनुसार राहुल ढगे हे रात्री एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद- पूर्णा या रेल्वेने पूर्णा येथे जात असताना लोंढेवाडी ते सारवाडीच्या दरम्यान रेल्वेतून खाली पडले आणि आज सकाळी नऊच्या सुमारास रेल्वेचे कर्मचारी गस्त घालत असताना अशोककुमार काळूराम वर्मा यांना ते मृत अवस्थेत दिसले. तालुका जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मारुती ढगे यांच्या उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात मृतदेह पाठविला. दरम्यान ढगे यांचे नातेवाईक दुपारच्या सुमारास जालन्यात पोहोचले आणि त्यांनी जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार ढगे यांचे या 20 मार्चला सैन्य दलात भरती होऊन दहा वर्षे पूर्ण होणार होते. 16 जुलै रोजी ते नगर येथे सातव्या महार बटालियनमध्ये बदलून आले आणि रात्री गावाकडे जाण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीने रात्रीच एका मुलीलाही जन्म दिल्याचे सांगितले आहे. वसमत तालुक्यातील पळशी या मूळ गावी त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com