जालना- बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे गट क्रमांक 27 मध्ये असलेली दीडशे वर्षापूर्वींची स्मशानभूमी 2018 पर्यंत सातबारावर नोंद होती .परंतु 2023 मध्ये ही नोंद गायब झाली आणि तिथे प्लॉटिंग सुरू झाली. या प्रकारामुळे माळी समाज संतप्त झाला आहे.
शेलगाव येथील माळी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,शेलगाव येथे गट क्रमांक 27 मध्ये पूर्वापार पिढी जात स्मशानभूमी आहे. तीन एकर जागेपैकी दहा गुंठे स्मशानभूमी व तीन गुंठे रस्ता अशी 2018 ते 2020 च्या सातबारा वर लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन म्हणून स्पष्ट नोंद आहे .या सातबारा वरून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ही नोंद गायब केले आहे. ही जमीन पूर्वी माळी समाजाच्या दौलत कमळुजी माळी वाघमारे यांची होती, आणि आजही या ठिकाणी अंत्यविधी होत आहेत. जमिनीचे मूळ मालक वाघमारे यांच्या वारसांनी दिवाणी न्यायालय बदनापूर येथे प्रकरण दाखल केले आहे आणि ते न्यायप्रविष्ठ आहे, असे असताना देखील गावातील काही व्यक्तींनी ही जमीन विक्री करून तिची रजिस्ट्री करून दिलेली आहे. खरेदीदार सध्या या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीचे सपाटीकरण आणि बांधकामाची तयारी करत आहेत .त्यामुळे ज्या ठिकाणी माळी समाजाचे अंत्यविधी झाले आहेत त्या मृतात्म्यांची विटंबना होत आहे .यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी जालना यांनी दिनांक 19 जुलैला या जमिनीसंदर्भात जैसे थे ठेवण्यासाठी स्थगिती आदेश दिलेले असताना देखील या ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम जलद गतीने सुरू आहे. ते बंद करावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे .दरम्यान गावकऱ्यांनी या स्मशानभूमी संदर्भात आत्मदहन करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तुर्तास हा इशारा मागे घेण्याचे गावकऱ्यांना सुचित केले आहे. निवेदन देण्यासाठी शिवाजी गाडेकर, गणेश वाघमारे, रमेश पाऊलबुद्धे, पांडुरंग तिडके, कृष्णा शिंदे ,कैलास खांडेभराड, अंबादास गाडेकर इत्यादी गावकऱ्यांची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172