जालना- शिवसेनेमध्ये सर्वात मोठे पद कोणते असेल तर ते शिवसैनिक आहे. या शिवसैनिकांच्या जीवावरच कोणी खासदार, कोणी मंत्री ,कोणी आमदार,बनतात त्यामुळे शिवसैनिकांना जपा ,त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी धावून जा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेला सुरुवात केली आहे . ही सुरुवात जालन्यातून केली. या यात्रेच्या प्रसंगी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की , गेल्या अडीच वर्षांमध्ये ठाकरे यांनी माझ्यावर टीका करण्याशिवाय काहीच केले नाही. परंतु आपण या टिके चे उत्तर कामामधून दिले. आता नवीन तुणतुणे वाजवत आहेत आणि ते म्हणजे मी गावाकडे जाऊन रुसून बसल्याचे. मला शेतीची आवड असल्यामुळे मी गावाकडे जाऊन शेती करतो. प्रत्यक्षात मात्र ते स्वतः घरामध्ये बसतात आणि मला रुसूबाई रुसू म्हणतात .त्यांच्या ह्या टीका करण्याला जनता देखील वैतागली आणि म्हणूनच जनतेने त्यांना कायमचे घरी बसवले. यासोबतच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार माजी आमदार राजेश टोपे यांना देखील “उसाचे राजकारण केले आणि शेतकऱ्यांना त्रास दिला तर तर माझ्याशी गाठ आहे” असा गर्भित इशारा दिला आहे.
जालना जिल्ह्यातून जालना आणि घनसांवगी हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेकडे गेले आहेत. जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि घनसावंगी चे आमदार हिकमत उढाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते .हिकमत उढाण यांनी घनसावंगी मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली तर आमदार खोतकर यांनी यापुढे आपण सुडाचे नाही तर विकासाचे राजकारण करणार असल्याचे सांगितले .जालना शहरातील आझाद मैदानावर ही सभा झाली. मैदानात बसायला जागा नसल्यामुळे अनेक श्रोते बाहेरच उभे होते.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172