जालना- जिल्हा परिषदेमध्ये आज दिनांक 31 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, सामान्य प्रशासन च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैशाली रसाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती कल्पना सूर्यवंशी,तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी आज स्वतः हातात झाडू घेऊन जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. सहाजिकच अधिकारी आल्यामुळे कर्मचार्यांनाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छता मोहीम हाती घेतली. एकंदरीत आज सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जालना जिल्हा परिषद स्वच्छ झाली यात मात्र शंका नाही .
या मोहिमेबद्दल बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैशाली रसाळ म्हणाल्या की, स्वातंत्र्यप्राप्तीचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तसेच औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वच्छ कार्यालय उपक्रमाअंतर्गत दिलेल्या सूचनेनुसार हा परिसर स्वच्छ केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान परिसरात अनेक ठिकाणी भंगार आणि मोडकळीस आलेले लाकडी साहित्य, खुर्च्या, टेबल, यांचाही ढीग पडला होता. त्याचीही विल्हेवाट लावण्यात आली. परिसरातील काडीकचरा गोळा करून तोही नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीलाच लागून असलेल्या एका शाळेमधून हा कचरा जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये टाकले जातो त्यामुळे या शाळेला नोटीस बजवा अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल यांनी दिल्या. त्याच सोबत जिल्हा परिषदेच्या आवारात काही नागरिकांनी घरातील सांडपाणी सोडले आहे त्यांच्यावर देखील आता कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत आज जिल्हा परिषदेमध्ये कामकाजापेक्षा परिसर स्वच्छतेवर जास्त भर देण्यात आला.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna