जालना- जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील जाधव कुटुंब आज दिनांक 18 रोजी सकाळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेसाठी जात होते. एकत्रित कुटुंब जात असताना जालन्या जवळ अकोल्याकडे जाणाऱ्या बसचा आणि या खाजगी वाहनाचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये विजय सावळाराम जाधव वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला तर वैभव जाधव हा 13 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
कुटुंबातील उर्वरित सदस्य देखील यामध्ये जखमी झालेले आहेत. दरम्यान परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली आणि याचवेळी संतप्त झालेल्या जमावाने बसवर दगडफेक करून काचाही फोडल्या.
अंबड आगाराची बस छत्रपती संभाजी नगर ते अकोला ही सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालनाच्या जवळच असलेल्या कन्हैया नगर कडून अकोल्याकडे जात होती त्याचवेळी जालन्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा आणि बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये खाजगी वाहनाचा चुराडा झाला आहे. हे सर्व भाविक मांगिरबाबाच्या यात्रेसाठी जात होते दरम्यान तालुका पोलीस ठाण्यामध्ये दुपारी उशिरापर्यंत या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com